Sunday, November 30, 2014

मामाचं गाव (इसावअज्जा)

"राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे."
मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते.. चला मामाच्या गावी!
मामाच्या गावाला जायचे,
आंब्याच्या झाडावर घर बांधायचे..
विहीरीवर अंघोळीला जायचे,
तेव्हा थोडे पेरु चोरायचे...
असली अफाट कल्पना घेऊन पोहचलेला आपला भाचा पाहिल्या पाहिल्या पहिला प्रश्न काय तर "राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." अरे कसा आहेस विचार, गाल-गुच्चा घे, मामासाठी काय आणलं आमच्या राज्यानं असे बोबड्या भाषेत विचार! पण नाही "राखुंड्या" मास्तरासारखा पहिला प्रश्न अभ्यास नाही तर मार्काचा... पहिले काही दिवस बोंबलून सांगावे असे वाटत असेल मला की लेको.... तुमच्या कर्नाटकात आमच्या पेक्षा आधी २०-२५ दिवस निकाल लागतो रे.. आम्ही घरी गेल्यावर माझा निकाल कळेल.. पण कोण ऐकून घेईल तर शपथ!
तर गावच्या सुट्टीची सुरवात! त्यात मी नवसाचा.. एकुलता एक मुलगा जवळपास २०-२५ घरात (पाहुण्यांच्यात) कोणाच्या पण घरी गेला की पहिला प्रश्न ठरलेला "राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." मी घरातून का पळून गेलो या प्रश्नाचे हे उत्तर नसेल ही पण कुठल्या पाहूण्याच्या घरी कधीच न जाण्याचा संकल्प करण्याचे हेच नक्की कारण होते.
या लोकांना काय असुरी आनंद मिळत असावा असले प्रश्न पोरांना विचारून देवाकं ठावूक!
मामाचा वाडा त्यावेळी खूपच मोठा असल्यामुळे व आजोबा वृद्ध असल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात त्यांना भेटायला व सुट्टीचा आनंद घ्यायला सगळेच आजोळी यायचे, १६-१७ बहिणी (मावस, आत्ते इ. + सक्की एक) व त्यांच्या आया-बाबा आणि अनेक लांबचे पाहुणे एकावेळी त्या वाड्यावर हजर असतं! खाण्यात रेलचेल असे, पहाटे पहाटे पेटलेली चुल, आम्ही सर्व अंगणात झोपल्यावर रात्री कधी तरी चर्र असा आवाज करीत शांत होत असे. पहाटे पहाटे जाग यायची ती आजोबाच्या हाकेने. माझे दुदैव येवढे की एकुलता एक मुलगा असल्यामुळे सकाळचा शंख माझ्या नावानेच होत असे.. आजोबा मुलींना चुकून ही काही बोलत नसतं, हा त्यांना प्रेमाने खाऊ घाल, सगळ्यांना गोळा करून गोष्टी सांग, स्वातंत्र्य लढ्यात बेळगाव आंदोलनात कशी इंग्रजाची पळतीभूई केली व नंतर कसा मार खल्ला या प्रामुख्याने गोष्टी.
मी आपला बापुडा त्या गोष्टी ऐकण्यासाठी तेथे जाऊन बसावे तोच शेतातील काम संपवून आलेला मामा कडाडत असे "राज्या! लेका बायकांच्यात काय बसला आहेस, बायल्या कुठला!, जा गोठ्यात रम्याला मदत कर" झाले सगळ्या मुली फिदीफिदी हसणार व माझा रंग उडणार हे ठरलेले. रडत आईकडे तक्रार घेऊन स्वयंपाक घरात जावे तर कोणीतरी माउशी, मामी, आत्या, काकी म्हणायची "या राज्याला आईविना करमत नाही, यामुळेच बायकांमध्ये लुडबुड करायची सवय." व तोंडाला पदर लावून गालातल्या गालात हसत. मोठ्याने हसल्या की बाहेरून आजोबांच्या काठीचा आवाज येणार हे नक्की.
बरं या सगळ्याला वैतागून घरातून बाहेर पडण्यासाठी अंगणात यावे तोच लहान मामा "राज्या! घराबाहेर पाय टाकलस तर बघ. तंगडे तोडेन." बर त्याचे ऐकून गप्प परसबागेकडे जावे तर लगेच सन्नतात्या (लहान आजोबा आमचे) लगेच "राज्या! आकडे नी काल इड, निंद काल तगद् निंन कयागं उडत्यान नोड!" बोंबललं, मायला पुढून घरातून बाहेर पडायचे तर लहान मामा पाय तोडायला तयार व परसबागेत जावे तर ज्याने बाग (बाग कसली, रोजच्या भाज्या लावलेल्या) लावली तो पाय तोडून हातात देण्याची भाषा करतो. काय करावे काय करावे असले प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर मिरवत मी इकडे तिकडे भटकत असलो तर एखादी ताई-आक्का हमखास म्हणायची.."नोड.. हुंब ईदे इद" (बघ, वेंधळाच आहे हा) असे म्हणून परत फिदीफिदी हसायच्या.
शेवटी मी वैताग वैताग करुन इसावअज्जा च्या रुमकडे वळत असे.
इसावअज्जा= पोहायला शिकवणारे आजोबा, हेच नाव त्यांचे गावभर नाही तर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, या आजोबांनी एका आणि एक पोराला/मुलीला पोहायला आलेच पाहिजे असा चंग बांधला होता. हे आजोबांचे कोणीतरी लांबचे नातेवाईक होते, ब्रम्हचारी. पोरांना पोहायला शिकवले तर घरचे गहू-तांदुळ द्यायचे, कोणी फारच उदार असेल कधी कधी पैसे देखील. मला आज देखील ते आठवतात ते त्यांच्या दंतपंगतीहिन हास्यामुळे. त्यांचे नक्की वय किती आहे याची चर्चा रात्री अंगणात घरचे सगळे झाडून जेव्हा झोपायला गोळा होत तेव्हा वडीलधारी मंडळी करत म्हणजे पहा किती वय असेल त्यांचे. अज्जा-इसावअज्जा असे सगळेच म्हणत त्यामुळे त्यांचे नाव काय असावे याची चर्चा आम्हां लहान मंडळीमध्ये होत असे, त्याचे कारण म्हणजे मोठा मामा लहान होता तेव्हा त्याने धाडस करुन त्यांना नाव विचारले होते म्हणे व त्यांनी मामाला उचलून २०-२५ फुट खोल असलेल्या विहरीमध्ये फेकलं होते.. अश्या अनेक दंतकथा त्यांच्या बद्दल होत्या. पण मामाला त्यांनी उचलून विहीरीत फेकले होते हे ऐकून मला खूप आनंद झाला असलाच पाहीजे.
इसावअज्जा व माझे जरा बरं जुळत होते (परवा परवा माझी मोठी मामेबहीण मला सांगत होती, ते जेव्हा आजारी पडले व त्यांचे शेवटचे काही क्षण राहीले होते तेव्हा त्यांनी जुन्याकाळात जमणार्‍या गोतावळ्याची आठवण काढली होती व तु हरवला आहेस हे ऐकून ढसाढसा रडले होते.) इसावअज्जा मला त्याच्याकडे असलेल्या ठेवणीतील गोष्टी दाखवत असे. त्याच्या पत्र्याच्या पेटीत खूप काही अमुल्य असे दडलेले होते, त्या पेटीला एक सोडून दोन दोन कुलपे होती व त्याच्या चाव्या इसावअज्जा नेहमी जानव्यात अडकवून ठेवी. जेव्हा जवळपास कोणी नसेल तेव्हा तो ती पेटी उघडून बसलेला असे. त्या पेटीमध्ये काय आहे याची जेवढी उत्सुकता त्याबालसुलभ वयात मला होती तेवढीच थोरामोठ्यांना देखील होती हे आता-आता कळले. त्यांनी ते विश्व इतरांच्यापासून जरा जास्तच लपवून ठेवले होते.
इसावअज्जा माझ्यावर न जाणे का पण खूप प्रेम करायचा, अनेकवेळा इतरांपासून लपवून खाऊ देण्यापासून, प्रसंगी आजोबांचा रोष अंगावर घेऊन मला शेतात मनसोक्त दंगा घालण्यासाठी घेऊन जात असे. पोहणे शिवण्याच्यावेळी प्रसंगी मुलींना देखील उचलुन विहीरीत फेकणारा हा आजोबा मला मात्र पत्र्याचा (डालड्याचा डब्बा) किंवा लाकडाची मोळ बांधल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकू देत नसे किंवा त्यांनी मला कधीच आधाराविना पाण्यात जाऊच दिले नाही.
त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!
क्रमशः

Friday, November 28, 2014

मामाचं गाव (आजोबा)

वाड्याबाहेरील जग सुट्टीमध्ये फक्त कोणी मोठं सोबत असेल तरच पाहता यायचे एवढे कडक निर्बंध लहान मुलांच्यावर होते. रोज संध्याकाळी व्हासा झाल्यावर आजोबा आपली छडी घेऊन बाहेर पडत. ती छडी म्हणे त्यांनी पार्श्वनाथजीला* जाऊन ११ वेळा भगवान पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले म्हणून तेथील महाराजांनी भेट दिली होती. आजोबा वाड्यातून बाहेर पडायला लागले की जे कोणी लहान जवळ असेल, मग अक्का असो, सन्मती असो, सरु असो की मी असो. त्यातील एकाला सोबत घेऊन जात. त्यांचा हा रिवाज माहीत असल्यामुळे ते व्हासा करायला बसले की मी त्यावेळे पासून ते बाहेर पडण्यासाठी मोठ्या दरवाजाजवळ येवू पर्यंत मी त्या दरवाज्या जवळच घुटमळत असे. त्यामुळे ९९% मीच त्यांच्या सोबत बाहेर पडत असे.
डोक्यावर गांधी टोपी, डोळ्यावर काळी फ्रेम असलेला चष्मा, पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच स्वच्छ पांढरे धोतर, हातात छडी, सदर्‍याच्या डाव्या खिश्यात साखळीवाले घड्याळ व एका हातात धोतराचे टोक. आजोबा जरी म्हातारे असले तरी त्यांनी गावातील व्यायामशाळेत दणकून व्यायाम करुन व जेवणानंतर शतपावली वर्षानू वर्ष करून आपले शरीर पिळदार ठेवले होते. मामा सांगायचा जेव्हा तो लहान होता तेव्हा आजोबा जोर मारायचे व हा मोजायचा. दंडबैठका मध्ये तर आजोबाचा हाथ धरणारा कोणी नव्हता त्या व्यायाम शाळेत. आजोबा जर आनंदात असले तर दर्शनमात्रे मधील श्लोक गुणगुणत जायचे व मध्येच मला कधीतरी नमोकार मंत्र म्हण रे, नाही तर चल २४ तिर्थंकरांची नावे सांग पाहू ते पण क्रमाने. असाले प्रश्न विचारून मला कोंडीत पकडायचे. अश्यावेळी काय करायचे हे माझं ठरलेले असायचे, गपचूप नमोकार मंत्र म्हणायचे व तीन वेळा म्हणून गप्प बसायचे, कारण आजोबा बाहेर पडले आहेत म्हणजे गावातील जाणकार व मोठी लोक त्याच वेळी घरातून बाहेर पडलेली असायचीच. त्यामुळे कोणी ना कोणी भेटायचे व मुळ मुद्दा बाजूला पडायचा.
गावातील मोठ्या वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर ही सगळी म्हातारी लोक जमा होत व गप्पा मारत, सगळा विषय शेती, पाणी, पाऊस व गुरे यावर फिरत असे. पाराच्या समोर गुलाबमामाचे पानाचे दुकान होते, त्याच्या दुकानात काचेच्या बरण्यामध्ये लाल गोळ्या ठेवलेल्या मला लांबून पण दिसायच्या व मी आजोबांना फक्त एवढेच विचारायचो "आप्प्पा, गुलाबमामा!" डोक्यावर टपली मारुन आजोबा हसायचे व जा असे मानेने सांगायचे. गुलाबमामा मुसलमान, आमच्या वाड्याच्या गल्लीत एका टोकाला त्यांचे घर होते, ते रोज वाड्या समोरुन येता जाता दोन्ही हात वर जोडून "नमस्कार री" असे जोराने म्हणून पुढे निघून जायचे. त्यांचा तो नमस्कार कोणाला असे हे मला कधी कळले नाही, कारण दरवाज्यावर कोणी असले नसले, दरवाजा उघडा असला नसला तरी त्या नमस्कारात खंड असलेला मला तरी आठवत नाही. गुलाबमामाच्या दुकाना समोर गेल्या गेल्या गुलाबमामा हसून स्वागत करायचा व म्हणायचा "बररी सावकार! लाल गुळगी बेकू?" मी हसून हात पुढे केला की पटापट २-३ गोळ्या हात ठेवायचा व मी लगेच धूम ठोकून आजोबांच्याकडे पळायचो.
मी पारावर पोचू पर्यंत आजोबा निघायच्या तयारीत उभे राहायचे, डोक्यावरील टोपी नीट करायचे, खिश्यातील घड्याळ काढून वेळ बघायचे, धोतराचे टोक एका हातात व छडी जमीनीवर दोनदा आपटून "नडीर, बरतेव!" म्हणायचे व सरळ चालायला सुरवात करायचे, मागू बाकीचे "बररी सावकार" म्हणायचे पण आजोबा तिकडे लक्ष न देता सरळ बस्तीकडे चालु लागायचे. बस्तीत पोचल्या पोचल्या आतून पुजारी जवळ जवळ धावत यायचे, बाजूच्या विहीरीतून एक बादली पाणी मोटीने काढून तेथे उभे रहायचे. मग आजोबा त्यातील पाण्याने पाय धुवायचे, चेहर्‍यावर थोडे पाणी शिंपडायचे व मानस्तंभाकडे चालू लागायचे. मी पटापट आजोबानी जे जे केले ते सगळे करायचो व धावत पळत त्यांच्या मागे जाउन उभा राहत असे. मानस्तंभाचा पहिला भाग जो जमिनीकडून वर जातो तो माझ्या उंच पेक्षा पण उंच होता व ते मला माहीती होते तरी त्या भागावर चढण्याची माझी नेहमी धडपड असे, कारण येणारा प्रत्येक भाविक तेथे मनूके, बदाम व तांदूळ वाहत असे, तांदूळ मध्ये मला रस नव्हता पण मनूके व बदाम हवे असायचे. आजोबा माझी धडपड बघायचे व छडीने पार्श्वभावर हलकासा मार देऊन मुख्य मंदिराकडे जायचे. मागू आलेले पुजारी पटकन मला उचलायचे व मी हातात येतील तेवढे मनुके व बदाम गोळा करत असे, तोच आतून आजोबा बोलवायचे.
बस्तीमध्ये असे धीरगंभीर होऊन बसलेले आजोबा, समोर पार्श्वनाथ स्वामी तसेच पद्मासनात स्मित करत बसलेले, उजवीकडे कोपर्‍यात पदमावतीदेवी व डावीकडे कोणीतरी गंधर्व सगळेच चूप! थोड्यावेळाने माझी चुळबुक वाढत असे, मग समोरील पाठावर असलेल्या तांदूळामध्ये स्वस्तिक काढ, झाड काढ असले खेळ चालु होत असे किंवा कोणी कुठे कुठे मनुके, बदाम ठेवले आहेत त्याचा शोध चालू होत असे. आजोबांचे ध्यान/पुजा संपत आली की ते थोडे मोठ्याने नमोकार मंत्र म्हणायचे व मी आपल्या जागेवर येऊन बसायचो. मी एवढ्यावेळात काय केले हे आजोबाना माहीती नसेल असे मला नेहमी वाटायचे पण ते जाताना मला जवळ खेचत म्हणायचे जा दो-तीन मनुके व बदाम पार्श्वनाथांना देऊन ये. मी आपला कसाबसा सगळयात छोटा मनूका व बदाम देवासमोर अगदी अनिच्छेने ठेऊन येत असे व नमोकार मंत्र म्हणून आजोबाच्या मागे मागे बाहेर पडत असे.
आजोबांची अजून गोष्टी होती ज्यांचे आम्हा सगळ्या लहानग्यांना अप्रुप होते, आजोबा झोपताना आपले दात काढून ठेवायचे. तसे आम्हाला का काढता येत नाहीत हे सगळ्या लहानग्यांनी कधी ना कधी आपल्या आईकडे तक्रार केलेली असेलच. मी आजोबा कवळी काढले की मी त्यांच्या जवळ जाऊन बसत असे व त्या काचेच्या ग्लास मध्ये ठेवलेली कवळी निरखत बसत असे. रॉकेलचे मोठे मोठे दिवे घरात सगळीकडे लावलेले असले तरी आजोबांच्या गादी जवळ एक मोठी पितळेची समई लावलेली असे. त्या समईच्या उजेडामध्ये आजोबा कधी कधी खाते वही घेऊन हिशोब करत बसलेले असायचे. अश्यावेळी त्यांच्या जवळ जाण्यास लहानांनाच काय मोठ्यांना देखील परवानगी नसावी. एकदा का त्यांनी वही बंद केली की शांत झालेले घर परत बोलू लागत असे. मग गोष्टी काय, गप्पा काय यायला उधान यायचे. मग खाली अंगणात हंतरुणे टाकली जायची, मोठा मामा कट्टावर आजोबांच्या खुर्ची शेजारी बसून, अडकित्याने सुपारी फोडत त्यातील छोटे छोटे तुकडे तोंडात टाकत शेतातील गप्पा आजोबाना सांगत बसे व आजोबा आराम खुर्चीवर डोलत फक्त ह्म्म हम्म्म करत रहायचे.
रात्री कधी तरी आम्हाला झोप लागायची पण त्यावेळी देखील ही मोठी मंडळी काहीतरी बोलत बसलेली असायचीच. मध्येच कधीतरी राज्या, कोल्हापूर असे शब्द कानावर आले की डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न अतीव झोपेमुळे राहुन जायचा. असेच एकदा रात्री जाग आली म्हणून उठलो तर सगळीकडे गुडुप्प अंधार व जवळपास सगळे झोपलेले व स्वयंपाक घरात मामी व आज्जी शेवटची आवरा आवर करत असलेला आवाज हळूहळू येत होता, इकडे तिकडे पाहिल्यावर आजोबा सगळ्या लहान मुलांच्या अंगावरील चादरी ठीक करत माझ्याजवळ येत होते. जेव्हा ते माझ्याजवळ आले तेव्हा मी डोळे मिटून गप्प पडून होतो. माझी चादर नीट करून ते तेथेच उश्याशी बसले व माझ्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले " सुसा, निदं हुडग अंदरे नंद जिवा. नंग यानू आइतू अनंद्रे तगंद बा अप्पी." मग माझी आई म्हणाली "आप्पा, गुरुत इदे मलकोरी.. इने राजान मदवी आगले." आजोबा दिलखुलास हसले व आई व आजोबामध्ये गप्पा चालू झाल्या. अनेक विषय झाले असतील, पण तो पर्यंत मला झोप लागली असेल किंवा मला त्यातील काही आठवत नसेल.
क्रमशः
* पार्श्वनाथजी - बिहार मध्ये असलेले जैन समाजाचे एक मोठे तिर्थक्षेत्र.
* व्हासा - रात्र पडण्याआधी केलेले जेवण
* "सुसा, निदं हुडग अंदरे नंद जिवा. नंग यानू आइतू अनंद्रे तगंद बा अप्पी." - आईला आजोबा सुसा व प्रेमाने मुलींना अप्पी म्हणायचे. तुझ्या मुलावर माझा खूप जीव आहे. मला काही झाले तर आधी याला माझ्याजवळ घेऊन ये.
* "आप्पा, गुरुत इदे मलकोरी.. इने राजान मदवी आगले." - आप्पा (आजोबा) माहीती आहे, झोपा आता. अजून राजाचं लग्न व्हायचे आहे.

Monday, November 24, 2014

V for Vendetta

एखाद्या चित्रपटातील एखादं वाक्य, संवाद आपल्या मनात घरं करून राहतं. काही केल्या ते मनातून हटत नाही व जेथे जेथे वाक्या संदर्भातील परिस्थिती असते तेव्हा आपल्याला हमखास ते वाक्य तो संवाद आठवतो. मग आपण हलकेच स्मित करतो व पुढील कामाला लागतो. तसेच काहीसे सध्या माझे होत आहे. मागील अनेक दिवस माझ्या सहीमध्ये, गुगल/फेसबुकच्या स्टेट्स मॅसेजमध्ये "remember remember the fifth of november" हे वाक्य होते. अनेकांनी विचारले या वाक्याचा संदर्भ काय आहे तर, आता सांगतो काय संदर्भ आहे ते.
२००५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका चित्रपटातील नायकाच्या तोंडी असलेले ते वाक्य आहे. चित्रपटाचे नाव आहे V for Vendetta. चित्रपटाची सुरवातच या वाक्याने होते "remember remember the fifth of november" आधी तुम्हाला दोन गोष्टी कळायला हव्यात, एक Vendetta म्हणजे काय ? वेंडेटा म्हणजे एखाद्याच्या विरुद्ध आघाडी उघडणे अथवा निर्णायक लढाईचा बिगुल वाजवणे. व व्ही म्हणजे ? व्ही म्हणजे चित्रपटाचा नायक. जो स्वतःला व्ही म्हणून घेतो, चित्रपटात त्याचे नावच व्ही आहे.मी नायक म्हणालो का? व्ही खरंच नायक आहे का चित्रपटाचा ? रुढ अर्थाने तो नायक नाही. त्याला चेहरा नाही आहे. तो पुर्ण चित्रपटभर मुखवटा घालून वावरतो. त्याला स्वतःचे असे नाव नाही ना त्याला ते सांगायची इच्छा. का असावा चेहरा? का असावे नाव? नाव चेहरा आला की वर्ण येतो, जात नाव?, देश येतो, या सर्वाच्या पलिकडे असलेला हा नायक.
चित्रपटामध्ये सुरवातीला ४०० वर्षापुर्वी घडलेली एक छोटी घटना दाखवली आहे, ज्याचा संदर्भ पार्श्वभुमीवर पुढील वाक्य येत जातात "Remember, remember the 5th of November. The gunpowder, treason, and plot. I know of no reason why the gunpowder treason should ever be forgot." एका दुष्ट राजशक्ती विरुद्ध बंड करू पाहणार्‍या क्रांतिवीराला राज शक्तीचे प्रतिक विस्फोटाद्वारे उडवून देण्याच्या प्रयत्न केला म्हणून फाशीची शिक्षा दिली जाते व दिवस असतो......5th of November.
आता चित्रपट ज्या काळामध्ये आपल्याला घेऊन जातो तो काळ म्हणजे ४ नोव्हेंबर २०३०, परिस्थिती अशी आहे की इंग्लंडमध्ये सत्तापालट होऊन फॅसिस्ट पक्षाचा नेता हुकुमशहा म्हणून उदयास आला आहे. जसे एका हुकुमशहा च्या देशात चालायला हवे तसे सगळे तेथे चालत आहे. सामान्य जनतेला घराबाहेर राहण्याचे वेळापत्रक आहे, कला संगीत यावर बंदी आहे, हुकुमशहा विरुद्ध बोलायला विरोध आहे. बेबंदशाही माजलेली आहे. शक्ती व भिती या जोरावर जनतेवर अत्याचार नियमित चालू आहेत. मिडियापासून सर्व सुरक्षा यंत्रणादेखील त्या हुकुमशहाच्या पुर्णतः ताब्यात आहे. विरुद्ध आवाज दाबण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा त्यांने उभी करून ठेवली आहे. ज्यावेळी घरातून बाहेर पडणे गुन्हा आहे, अशावेळी बाहेर पडलेल्या एका स्त्रीला (Evey Hammond) गुप्त पोलिस त्रास देत असताना व्ही तेथे येऊन तिला वाचवतो, व तिला व सर्व शहराला एक आश्चर्याचा धक्का देतो.
जनतेला संदेश, चेतावनी देता यावी म्हणून शहरात सर्वत्र मोठ मोठे स्पिकर लावले आहेत, ज्यातून रुक्ष आवाजात संदेश व चेतावनी ऐकण्याची सवय जनतेला आहे व व्ही त्यातून स्वातंत्र्य गीत वाजवता वाजवता राजशक्तीचे प्रतिक म्हणता येईल अशी एक इमारत विस्फोटाद्वारे नष्ट करतो, ती इमारत असते "Old Bailey" मुख्य क्रिमनल कोर्ट. "Remember, remember the 5th of November. The gunpowder, treason, and plot. I know of no reason why the gunpowder treason should ever be forgot." एका युद्धाची सुरवात. एक व्यक्ती विरुद्ध एक पुर्ण व्यवस्था, सिस्टम! दुषीत, दुष्ट अशी सिस्टम!!!
हादरा! एका बलदंड राजसत्तेला आव्हान देण्यात व्ही यशस्वी होतो. लढाईची सुरवात होते हुकूमशाही विरुद्ध व्हीची लढाई!!! Old Bailey सारखी एखादी पुरातन इमारत कोणीतरी हल्ला करून उडवली तर त्यात हुकूमशाहीला घाबरण्यासारखं काय आहे? हा प्रश्न मला पडला. चित्रपट तेथेच थांबवून विचार करताना एक गोष्टी लक्ष्यात आली. एखादा हुकूमशहा जनतेवर वर्षानुवर्ष आपला दरारा कश्याच्या जीवावर ठेऊ शकतो ? तर त्याची शक्ती त्याचे सैनिक, त्याची स्वतःची पोलिस व न्याय व्यवस्था हे आहेत. व्ही पहिला हल्लाच त्याच्या या शक्तीवर करतो. मुख्य क्रिमनल कोर्टाची इमारत तो विस्फोटाच्या द्वारे नष्ट करतो. चेतनाहीन जनतेत थोडेफार का होई ना नवचेतना जागृत होते. हुकूमशहा म्हणजे काही देव नाही आहे, यांना पण धक्का देतो येतो हे जनतेला हलकसं कळून येतं.
सर्वात प्रथम प्रश्न समोर येतो तो एकच हा व्ही कोण? कोणालाच माहिती नाही, हुकूमशहा गोंधळून गेला आहे, हा अचानक नवा शत्रु कोण निर्माण झाला हे शोधण्यासाठी तो आपली सर्व शक्ती लावतो. येथे थोडी वेगळी खेळी हुकूमशाही कडून खेळली जाते. तत्काळ हुकुमशाहीकडून सांगितले जाते की इमारत धोकादायक झाली होती म्हणून आम्हीच ती पाडली, व टिव्हीवर ते या संबधीत बातमी प्रसारित करून संभाव्य विद्रोहाचा धोकाला टाळण्याचा प्रयत्न करतात, पण तोच व्ही जनतेच्या समोर येतो. हुकुमशाहाच्या ताब्यात असलेल्या एका प्रसिद्ध टिव्ही चॅनलवर हल्ला करून ते ताब्यात घेऊन टिव्हीवर सर्व जनतेसमोर तो पहिली घोषणा करतो " Old Bailey इमारत मी उडवली, ही मदमस्त सत्तेत चूर असलेल्यांना माझी चेतावनी आहे. आज, पाच नोव्हेंबर मी पुढील वर्षी याच दिवशी पाच नोव्हेंबर ला ही सत्ता नष्ट करून हुकुमशहाला ठार मारेन.... remember remember the fifth of november!"
तो काय म्हणतो टिव्हीवर हे पुर्ण वाचणेच इष्ट ठरेल.
"Good evening, London. Allow me first to apologize for this interruption. I do, like many of you, appreciate the comforts of every day routine- the security of the familiar, the tranquility of repetition. I enjoy them as much as any bloke. But in the spirit of commemoration, thereby those important events of the past usually associated with someone's death or the end of some awful bloody struggle, a celebration of a nice holiday, I thought we could mark this November the 5th, a day that is sadly no longer remembered, by taking some time out of our daily lives to sit down and have a little chat. There are of course those who do not want us to speak. I suspect even now, orders are being shouted into telephones, and men with guns will soon be on their way. Why? Because while the truncheon may be used in lieu of conversation, words will always retain their power. Words offer the means to meaning, and for those who will listen, the enunciation of truth. And the truth is, there is something terribly wrong with this country, isn't there? Cruelty and injustice, intolerance and oppression. And where once you had the freedom to object, to think and speak as you saw fit, you now have censors and systems of surveillance coercing your conformity and soliciting your submission. How did this happen? Who's to blame? Well certainly there are those more responsible than others, and they will be held accountable, but again truth be told, if you're looking for the guilty, you need only look into a mirror. I know why you did it. I know you were afraid. Who wouldn't be? War, terror, disease. There were a myriad of problems which conspired to corrupt your reason and rob you of your common sense. Fear got the best of you, and in your panic you turned to the now high chancellor, Adam Sutler. He promised you order, he promised you peace, and all he demanded in return was your silent, obedient consent. Last night I sought to end that silence. Last night I destroyed the Old Bailey, to remind this country of what it has forgotten. More than four hundred years ago a great citizen wished to embed the fifth of November forever in our memory. His hope was to remind the world that fairness, justice, and freedom are more than words, they are perspectives. So if you've seen nothing, if the crimes of this government remain unknown to you then I would suggest you allow the fifth of November to pass unmarked. But if you see what I see, if you feel as I feel, and if you would seek as I seek, then I ask you to stand beside me one year from tonight, outside the gates of Parliament, and together we shall give them a fifth of November that shall never, ever be forgot."
ज्या स्त्रीला, म्हणजे (Evey Hammond) इव्हला व्हीने सुरवातीला वाचवले असते ती त्याच टिव्ही चॅनल मध्ये काम करत असते, ती स्वतःचा जीव धोक्यात घालून व्हीचा जीव पोलिसांपासून वाचवते व या प्रयत्नात ती बेशुद्ध पडते, व्ही तेथून निसटण्यात यशस्वी ठरतो.
व्ही ला आतंकवादी म्हणून जाहीर केले जाते. त्याने केलेले कृत्य हे आतंकवादी कृत्य आहे हे जनतेच्या मनावर बिंबवले जाते. व व्ही मारला गेला आहे अशी ब्रेकिंग न्युज दाखवली जाते. सत्तेवर झालेल्या पहिल्या हल्लामुळे, व्हीच्या भाषणामुळे निर्माण होऊ शकणारी चेतना, स्वातंत्र्याची ललक तेथेच शांत होईल या आशेपोटी.. काही अंशी ती खरी देखील ठरते.
आपला जीव वाचवण्याच्या नादात बेशुद्ध पडलेल्या इव्ह ला व्ही आपल्या घरी घेऊन येतो. इव्हचे आई-वडिल देखील हुकुमशाहीचा अहिंसमार्गाने विरोध करता करता गेले असतात. आता व्ही हुकुमशहा बरोबर तन, मन धन लावून त्याच्यासाठी काम करणार्‍या त्याच्या टिमच्या सदस्यांना मारण्यास सुरवात करतो.
इकडे इव्हला व्हीची भिती देखील वाटत आहे व एक प्रकारचा आदर देखील. व्ही क्रुरपणे माणसांना मारतो आहे व त्याचे तो समर्थन या वाक्यात करतो "Violence can be used for good." त्यामुळे नेमकं काय करावे हे तिला कळत नाही आहे, अपर्हायपणे तीला व्ही सोबत रहावे लागत आहे व पण त्यामुळे तीला हळू हळू व्हीचा मानवी चेहरा दिसू लागतो. तो कोण आहे हे जाणून घ्याची उत्सुकता तिला आहे व ती त्याला विचारते " तु मुस्लिम आहेस?" व्ही उत्तर देतो "No. I'm in television."
खरं पाहीले तर या चित्रपटाचे तीन भाग आहेत.
एक> व्ही, जो हुकुमशहा विरुद्ध लढतो आहे, एकटा.
दोन> व्ही, जो इव्हला (म्हणजेच सर्वसामान्य जनतेला) अन्याया विरुद्ध उभे राहण्यास प्रवृत्त करतो आहे.
तीन > व्ही, स्वतः.
हा चित्रपट तुम्हाला अतिरंजित पासून ते काहीतरी काय.. कसे कसे घडेल असे काही वाटायला लावू शकतो. पण तुम्ही हा चित्रपट पाहताना एक ही व्हीची फ्रेम चुकवू नका. कारण प्रत्येक व्हीची फ्रेम हा एक संदेश, एक अर्थ देतो असतो तुमच्या पहाण्याला. व्हीला चेहरा नाही आहे त्यामुळे तो आपल्या भावना, आपले विचार तुमच्या पर्यंत हाताद्वारे, कृतीद्वारे पोहचवतो. नेमका हा चित्रपट काय आहे? एका क्रांतीवीराची गाथा, एक तिरसट व्यक्तीचा वेडा प्रयत्न की अजून काही हे प्रश्न तुम्हाला येथे पर्यंत पडतातच.
व्हीला समांतर सरकार उभे करायचे नाही आहे, तर त्याला असलेले सरकार, व्यवस्था, सिस्टम उखडून टाकायची आहे. हा वेडपट कल्पना उराशी बाळगून हे युद्ध लढत नाही आहे. व्ही हा समंजस, आपल्या विचारांशी निष्ठांवंत व प्रामाणिक आहेच. त्याच बरोबर त्याला युद्धकलेची जाण, संगीताची, वाचनाची आवड देखील आहे. त्याचा मार्ग त्याने व्यवस्थीत आखून घेतला आहे व त्या बरहुकुम तो कार्य करत आहे. इव्हा मध्ये येणे यांने व्हीला फरक पडत नाही, पण इव्ह च्या जीवनात फारमोठा बदल घडून येतो. एकतर ती व्ही बरोबर आहे, ती व्हीची समर्थक आहे असा ग्रह गुप्त पोलिसांचा झालेला असतो व काही अंशी तो खरा देखील असतो. आई-वडिलांच्या हत्येचा बदला कोणीतरी घेत आहे हे पाहून ती आतून सुखावत असतेच पण व्ही मध्ये ती हळू हळू तिच्या वडिलांना पाहू लागली आहे की काय इतपत ती व्ही मध्ये गुंतते.
चित्रपट मध्यंतरी एक मोठा वळणावर येऊ थांबतो जेव्हा इव्हाला हुकुमशहाचे समर्थ गुप्त पोलिस इव्हला पकडतात व तीची रवानगी यातना गृहात केली जाते. व्हीच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी तीच्यावर वेगवेगळ्या प्रकारे शारिरीक व मानसिक अत्याचार केले जातात व तीच्या काळकोठडीत एका उंदराच्या बीळात टॉयलेट पेपर वर एका स्त्री कैद्याने लिहलेली आत्मगाथा तिच्या हाती पडते, सिस्टमने माणसाच्यावर केले अत्याचार व एकून जनतेला तुच्छ किंमत देऊन. त्यांचे जीवन मातीमोल करणारा हुकुमशहा बद्दल जस जसे तिला कळत जातात, एका प्रयोगाची किंमत, स्वातंत्र्य मागण्याची किंमत तीला समजत जाते, तस तसे तिच्यातील कुमकुवत इव्ह, सिस्टमला घाबरणारी इव्ह मरून जाते व एक कणखर इव्ह जन्मते. सिस्टमला सहकार्य अथवा मृत्यु यातील एक निवडण्याची वेळ येते तेव्हा खणखर इव्ह स्मिस्टमला सहकार्य करण्याचे नाकारते. अचानक तीला सोडलं जातं. काहीच कारण न देता, जिवंत. थोड्या वेळानं इव्हला कळतं ही हा सगळा व्ही ने केलेला बनाव आहे.
इव्हला व्ही सत्यकथन करतो, व सांगतो कश्या प्रकारे हुकुमशाही सरकारने अणूशक्तीचा वापर आपल्याच जनतेवर गुप्तपणे करणार्‍या एका प्रयोग शाळेत ८००००० हून अधिक कैद्यांचा बळी जातो. त्या प्रयोगशाळेत आग लागल्याने तो प्रयोग विधंसक रूप घेतो त्या आगीतून एकच कैदी वाचतो तो व्ही. व तीला कैदेच्या काळात जी पत्रे वाचायला मिळालेली असतात ती खरीखुरी पत्रे असतात जी व्हीच्या शेजारच्या कोठडीत असलेल्या मुलीने लिहलेली असतात. इव्ह ला स्वातंत्र्याची किंमत कळावी व त्याची ललक निर्माण व्हावी आपल्यासारखंच कोणीतरी दुसरे देखील असावे या भावनेतून व्ही इव्ह ला सशक्त करतो.
****** चित्रपट परिक्षण समाप्त ******
तसे पाहता चित्रपटात पुढे तीच स्टोरी आहे, खलनायकाचा खातमा, क्रांतीकारकाचे बलिदान व जनतेचा विजय.
हे लिहणार नाही आहे मी. हे तुम्ही चित्रपट पाहताना पहालचं. मी तुम्हाला चित्रपट पहा असे का सांगतो आहे त्या विषयी लिहतो.
चित्रपटाचे कथानक पाहिले तर एखादी बॉलिहुड चित्रपटाची कथा शोभेल अशी आहे. पण खरचं तशी आहे का?
चित्रपटातून काय घेण्यासारखं आहे, त्यात मनोरंजन मुल्य आहे का? हे प्रश्न थोडे बाजूला ठेऊन हा चित्रपट आहे हे विसरून आपण जर कथानक पाहिले तर...?
अनेकदा नकळत आपण देशातील सिस्टम विषयी बोलताना बोलून जातो, हिटलरशाही हवी होती, हुकुमशाही हवी होती, एका माणसाच्या हातात देश द्या कसा सुधारत नाही ते पहा. पण खरचं असे झाले तर?
जगातील कुठल्याही सुखाची किंमत ही जनतेचे स्वातंत्र्य असू शकत नाही. कोणी जर उद्या मी स्थिरता देतो, वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावतो, बेबंदशाही मिटवतो, तुमच्या सगळ्या अडचणी दुर करतो फक्त एकहाती सत्ता द्या असे म्हणाले तर मी छातीवर हात ठेऊन सांगतो मी नकार देईन. माझे स्वातंत्र्य गमावून मला ही सिस्टम सुधरणे कदापी मंजूर नाही. कारण एकहाती सत्ता म्हणजे हुकुमशाही व कसलीही हुकुमशाही एक अधिकारशाही ही वाईटच. ती जनतेचे कधीच भले करू शकणार नाही. ती फक्त आपल्याला हुकुम देणार्‍या व्यक्तीच्याच भल्याचे विचार करेल ती सिस्टम आपण स्वतः मागणे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडणे.
ज्यांना ज्यांना आपल्या देशात हुकुमशाही हवे असे वाटते त्यांनी हा चित्रपट नक्की पहावा व व्ही च्या तोंडी असलेल्या प्रत्येक वाक्याला समजून घ्यावे. हा योगायोग नव्हता की २००६ नंतर जगभरात अनेकजागी जनतेच्या आंदोलनात व्हीचा मुखवटा दिसत होता. there is something terribly wrong with this country. हे जाणवणं खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी सिस्टमच्या आपण एवढे एकरूप होऊन जातो की चूक का बरोबर काय याकडे लक्ष आपले जात देखील नाही. आपल्या अधिकारांची, आपल्या स्वातंत्र्याची किंमत ही क्षणिक सुखासोबत होऊ शकत नाही. स्वातंत्र्य ही आपली शक्ती आहे. येथे, आपल्या घरी, ऑफिसमध्ये, नाक्या नाक्यावर, मैदानात आपल्याला हवे तेथे आपण आपल्या सरकारला शिव्या घालू शकतो, त्याच्या विरोधात बोलू शकतो. विरोध प्रकट करू शकतो हे स्वातंत्र्य आहे व याची किंमत तुम्ही पारतंत्रात गेल्यावर समजून घेणार आहात का?
V for Vendetta हा फक्त एक चित्रपट आहे, पण आपल्याकडे तर दिवसला एक या पेक्षा जास्त वेगाने चित्रपट बाहेर पडतात. चित्रपटाने काय फरक पडतो. पण आखून दिलेल्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडणे व त्याची सशक्त मांडणे करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे एका चित्रपटाने काय मनोरंजन दिले या पलिकडे बघण्यास भाग पाडण्यास V for Vendetta यशस्वी होतो.
सिस्टम विरुद्धचा लढा हा एकांगी कधीच नसतो. खलनायकाला मारले म्हणजे यश नाही. तर जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भूक निर्माण करणे व त्या पेक्षा सर्वात महत्त्वाचे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे जनतेला समजावणे व ते एकदा कळाले की सिस्टम हरते. स्वातंत्र्य तेथे आहे, नायक व खलनायक दुय्यम होतात, स्वातंत्र्य व स्वातंत्र्य लढा हे नायक होतात. आपण सर्वजण शक्यतो ९९% ( मीमराठीचे सदस्य व हे वाचन करणारे सर्वजण ) आपल्या यशस्वी स्वातंत्र्यलढ्या लढ्या नंतर जन्मलो आहोत. १५ ऑगस्ट १९४७ पुर्वीचा भारत व त्या नंतरचा भारत जमीन-आस्मानचा फरक आहे. काही प्रमाणात V for Vendetta हा फरक दर्शवतो. सरकार विरूद्ध बोलणे, आपल्या अधिकाराच्या गप्पा मारणे हा द्रोह होता १९४७ पुर्वी. तुम्ही एक लेख जरी सरकार विरुद्ध लिहलात तर तुम्हाला सरळ यातनागृहात पाठवलं जात असे. त्यावेळची सिस्टम त्यांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केली होती, सिस्टमच्या मदतीने भिती निर्माण करून स्वातंत्र्याची भावना समुळ नष्ट करणे हा उद्देश होता.
पण, चित्रपटात व्ही म्हणतो तसे And where once you had the freedom to object, to think and speak as you saw fit, you now have censors and systems of surveillance coercing your conformity and soliciting your submission. How did this happen? Who's to blame? Well certainly there are those more responsible than others, and they will be held accountable, but again truth be told, if you're looking for the guilty, you need only look into a mirror. हे सगळे आपण लादून घेतो स्वतःवर, कारण आपण आपल्या स्वातंत्र्याची खूपच कमी किंमत करतो व त्याचा गैरफायदा सिस्टम घेत.
व्ही चा उद्देश फक्त खलनायकाला संपवणे असते तर हा चित्रपटच उभा राहीला नसता. व्हीचा उद्देश हा स्वातंत्र्याची जाणीव करून देणे हा आहे, तो वेगाने हुकुमशहाच्या प्रत्येक प्रतिकावर, शक्तीस्थानावर हल्ले करून त्याला दुर्बळ बनवतो.
सरकार कोणाचे आहे याचा मला काय फरक पडतो हा जो कोणी विचार करतो त्यांने एकदा परत आत्मपरिक्षण करावे, व्ही म्हणतो तसे की सिस्टमला दोष देताना खरा गुन्हेगार कोण हे पहायचे असेल तर सर्वात आधी आरसा पहा. खरं आहे ते. आपली, आपल्यासाठी योग्य सिस्टम निवडण्याचा अधिकार असताना देखील तो अधिकार वापरला नाही तर आपल्याला नको असलेली, आपल्याला त्रासदायक सिस्टम तुमच्यावर अधिकार गाजवते हा दोष सर्वात जास्त तुमचा आहे, त्या सिस्टमला क्षणिक फायदासाठी निवडणार्‍यांचा आहे. ज्यांनी कधी सिस्टम निवडण्याचा अधिकार वापरलाच नाही त्यांनी तर भोगत असलेल्या प्रत्येक क्षणासाठी स्वतःला दोष द्यावा.
जेथे जेथे प्रस्थापितांच्या विरुद्ध आंदोलने होतील व लोक तळमळतेने आपल्या स्वातंत्र्याविषयी, अधिकारांच्या विषयी बोलताना दिसतील तेथे मला व्ही दिसेल कारण सरळ आहे, ज्यांने पारतंत्र म्हणजे काय, हुकुमशाही म्हणजे काय हे भोगले आहे त्याला आपल्या अधिकारांची व स्वातंत्र्याची किंमत समजते असा माझा समज आहे. पारतंत्र म्हणजे फक्त विदेशी शक्तीकडून येत नाही, ते आपल्या माणसांच्यामुळे देखील येऊ शकते. जगातील सगळेच हुकुमशहा हे त्याच मातीत जन्मलेले असतील, पण एकदा सिस्टमची ताकत हाती लागली त्याची शक्ती कळू लागते व एकदा शक्ती कळाली की हुकुमशहा निर्माण होण्यास वेळ लागत नाही.
हा पुर्ण चित्रपट मी एकटक पाहिला आहे, कारण भारत सुधारण्यासाठी काही काळासाठी का होईना हुकुमशाही हवी असे माझे देखील कधीकाळी मत होते, पण कालांतराने अनुभवातून, वाचनातून ते बदलत गेले व त्यावर शेवटचा हात या चित्रपटाने फिरवला. आपण आपले लोकशाहीने दिलेले अधिकार जेव्हा जेव्हा नाकारतो तेव्हा तेव्हा आपण हुकुमशाहीला इंचा इंचाने जवळ करत आहोत याची जाणीव पुन्हा जागृत करून देण्याचे काम या चित्रपटाने केले.
फक्त मनोरंजन करायचे, म्हणून का होईना हा चित्रपट पहा असा सल्ला मी माझ्या अनेक मित्रांना हा चित्रपट पाहिल्यानंतर दिला होता, व आता ही तोच देतो आहे, एकदा का होईना हा चित्रपट पहाच. अनेक चॅनेलवर हा लागतो कधी कधी, जर आधी कळले तर मी येथे कळवेन सर्वांना पण हा टोरंट, डिव्हीडी अश्या अनेक माध्यमातून उपलब्ध आहे थोडा शोध घेतला तर नक्की मिळेल. मी हे सर्वकाही पणे विस्कळीत लिहले आहे, मांडले आहे, १००% मान्य पण या मनातील भावना आहेत. वाचक समजून घेतील ही आशा. एकदा पहा हा चित्रपट शक्यतो माझ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने दुसरा कोणीतर भावना व्यक्त करेल ही इच्छा.

Monday, November 17, 2014

... देवाचं घर !

माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं. त्यावेळेस शेजारच्या चरणकर आजींनी सांगितलेलं एकच वाक्य राहूनराहून आठवायचं...”देव सगळीकडे असतो”
’खरोखरच देव सगळीकडे असतो का?’ मी कित्येक वेळा शाळेत जातायेताना आई अंबाबाईला विचारले असेल, “आई तू असतेस सगळीकडे तर दिसणार कधी? आणि मग तुझ्यासाठी हे मंदिर तरी कशाला ?” पण नेहमीच तिचा प्रसन्न, हसरा चेहरा माझ्याशी न बोलताच शांत असायचा. मग मी घरी परतलो की माझ्या आईला परत तेच प्रश्न. आई म्हणायची, “अरे जसे आपल्याला घर हवे तसेच आई अंबाबाईला पण हवे ना! त्यासाठी ते दगडाचे देऊळ.” तेव्हापासून प्रत्येक देवळात मला घर दिसतं...जिवंतपणाचा भास होतो. अगदी आजही प्रत्येक मंदिर संपूर्ण फिरून, प्रत्येक दगडाला हात लावला की त्यांची स्पंदनं मला जाणवतात.
कोल्हापूरला आमच्या घराजवळ लक्ष्मीसेन मठ नावाचा एक जैन मठ होता. तिथल्या तीर्थंकरांच्या संगमरवरात कोरलेल्या पांढ-याशुभ्र, देखण्या, रेखीव मूर्ती काय, तो कणखर काळ्या दगडातला डोंगराचा राजा ज्योतिबा काय किंवा कात्यायनीच्या मंदिरातील कात्यायनी मातेची मूर्ती काय! सा-याच कशा मूर्त होऊन समोर उभ्या असतात की जिवंत वाटतात पाहताना. कळत नकळत कधीतरी आपोआप हात जोडले जातात...कधी देवासाठी किंवा कधी त्या दगडात प्राण फुंकणा-या कारागीरांसाठी!
आपल्या महाराष्ट्रात मंदिरांच्या नाना त-हा! कोकणातलं देवगडपासून जवळच समुद्रकिना-यावर असलेलं एक शिवमंदिर...(नाव आठवत नाही आहे खूप वर्षांपूर्वी गेलो होतो) केवळ नितांतसुंदर! सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...
गणपतीपुळ्याच्या मंदिराचे तर काय वर्णन करावे? लाल दगडामध्ये उभे असलेले हे मंदिर...पेशवेकालीन शैलीचा प्रभाव...समोरच्या समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारे दहा मजली उंच कळस! शिखरांचा भार तोलणारे शेकडो हत्ती आणि वर पाय-यापाय-यांनी निमुळते होत जाणारे शिखर! देखणी कलाकुसर असलेले माझे एकदम आवडते मंदिर.
जैनांची मंदिरे तर दृष्ट लागावीत एवढी सुंदर...त्यातही श्वेतांबर जैंनाचे मंदिर म्हणजे तर स्वर्गीय. अगदी पहिल्या पायरीपासून शिखरापर्यंत सर्वकाही नीटनेटके...सर्व काही सफेद, निष्कलंक...देवापुढे तेवणा-या चांदीच्या समईच्या शुभ्र कळ्यांसारखी! बाहेरच्या रणरणत्या उन्हातून अचानक त्या संगमरवरी मंदिरात शिरल्यावर जसं शरीराला थंड वाटतं तसंच आतली महावीरांची अथवा तीर्थंकरांची शांतचित्ताने बसलेली मूर्ती, तिचे अर्धोन्मलित डोळे, अस्फुट मंदस्मित करत असलेले ते ओठ हे सारं पाहून आतूनदेखील तसंच थंड, शांत वाटतं.
दक्षिण भारतीय मंदिरे तर फक्त दर्शनाचा विषय नाहीच तेथे तर प्रत्येक मंदिर एक वेगळे विश्व आहे, त्यांचा एक वेगळाच बाज आहे. मला आठवतं ते विजयवाडामध्ये कृष्णा-गोदावरीच्या संगमाजवळ असलेले दुर्गा मंदिर...एखाद्या चित्रकाराने कागदावर पेन्सिलीने काढलेले रेखाचित्रच कागदातून प्रत्यक्षात यावं अगदी तसं!! देऊळ काळ्या पत्थरामध्ये तर शिखर अर्धे सोन्याने मढवलेले ! सकाळची कोवळी उन्हं त्या शिखरावर पडली की त्या झळाळीने आकाशात तरंगणा-या एखादया ढगाला सोन्याची झालर दिसत असे. अनेक अप्सरांच्या देवीदेवतांच्या रेखीव मुर्ती, त्यांचे भावरंगीन नृत्याविष्कार, त्यांच्या चेह-यावरचे तल्लीन भाव तिथे असे काही कोरलेले होते की देवांच्या सभेतल्या नारद-तुंबरांच्या गाण्याचा, सरस्वतीच्या वीणावादनाचा, मॄदुंगाच्या तालाचा भास होत रहातो. एकेका मूर्तीतून एकेक गोष्ट उलगडत रहाते...कालाच्या पटासारखीच निरंतर...गणेशमूर्ती असो वा ताडंव करण्या-या शंकराचे उग्र रुप दर्शन...विष्णू अवतार महिमा असो वा दुर्गेचं अक्राळविक्राळ रूप असो...हजारो वर्षापासून अखंड उन्हं, वारा पाऊस ह्याचा मारा झेलत उभे असलेली ही निःशब्द...निर्जीव मंदिरं नकळत बरंच काही सांगून जातात.
भटकत भटकत मी उत्तर भारतात आलो तसं हे वेडही माझ्याबरोबरच आलं. कलकत्यातील कालीमातेचे मंदिर असो वा लाल मंदिर असो, मनात कितीही कल्लोळ असला तरी मंदिराभोवती फिरताना मात्र एक प्रकारची आंतरिक स्थिरता जाणवली. जेव्हा मी सर्व प्रथम अमृतसरचे सुवर्ण मंदिर पाहीले तेव्हा थक्कच झालो. मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. तलावाच्या भोवतीच्या कठडयावर बसावं आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून शांत चित्ताने समोर चालू असलेला धार्मिक सोहळा पाहत बसावे...जिवंतपणी स्वर्गात असण्याची, अमृताच्या स्पर्शाची अनुभूती ती हीच असावी का? असं क्षणोक्षणी वाटावं असं वातावरण.
उंच डोंगरद-यावर देखील मानवाने अनेक सुंदर कला कृती निर्माण केल्या आहेत. त्या बाबतीत हिमाचल प्रदेश एक नंबरवर ! अनेक शतकापासून ह्या देवभूमीवर कित्येक मंदिरे आणि मठ वसलेले आहेत. कुलुमनाली इथे असलेले हिडंबा देवीचे पुरातन मंदिर असो वा चंबा येथील लक्ष्मी नारायण मंदिर...शिखर पद्धतीचं संपुर्ण दगडी बांधकाम.पहाताक्षणीच ह्यांचं वेगळेपण जाणवतं. इतर मंदिरांत गर्भगृहाला वरती कळस असतो. इथे मात्र पूर्ण मंदिराचा आकारच कळसासारखा असतो. हा गाभारा हा कळस असा वेगळं दाखवताच येत नाही.
आणखी एक सहज जाणवलेली गोष्ट म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरामध्ये भिंतीशिल्पांना मखर हा प्रकार नसतो. पण इकडे उत्तर भारतात मात्र एकेक भिंतीशिल्पंदेखील दगडी देव्हा-यात बसवलेली असतात. शिवाय उत्तर भारतीय मंदिरं तिथल्या आसपासच्या दगडामातीतून जन्मल्यासारखी वाटतात. कारण मंदिर उभं करण्यासाठी स्थानिक दगडांचा वापर केला जातो. दक्षिण भारतीय मंदिरामध्ये मात्र अनेकवेळा दुरदुरुन दगड जमा करुन मग मंदिर निर्माण केले गेले असावे असे वाटते. मंदिर आणि आसपासचा परिसर पाहिल्यावर देवळाचं वेगळेपण लक्षात येतं. कदाचित “मातीचे पाय” संपून दिव्यत्त्वाची सुरुवात ह्या देवळात होते हे तर इथे सुचवायचं नसेल नां?
बाहेरुन झालेले शेकडो हल्ले व मुस्लीम बादशाहांनी वेळोवेळी केलेली मंदिरांची तोडफोड ह्यामुळे उत्तरेतील अनेक सुंदर मंदिरे मातीमोल झाली पण त्याचवेळी पूर्वेकडे मात्र शिल्पकला बहरतच होती. त्यामुळेच ओडिसात अनेक सुंदर सुंदर मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत...मग ते जगन्नाथ मंदिर असो वा कोणार्कचे सूर्य मंदिर. पूर्वेकडली मंदिरं ही अखंड दगडातून उभी राहिली आहेत हे त्यांचे वेगळेपण म्हणता येईल. भुवनेश्वरमधील मंदिरे पाहिली की हे वेगळेपण खूप प्रकर्षाने जाणवतं व तिथल्या कलाकारांची कल्पक दूरदृष्टीदेखील! निमुळती होत जाणारी शिखरे व कामरसामध्ये रत असलेल्या यती-अप्सरांची भिंतीशिल्पंदेखील ह्यांचं एक वेगळेपणच म्हणता येईल. त्यावेळच्या राजेमहाराजांनी मंदिराच्यावर मनसोक्त धन खर्च केले त्यामुळेच इथले कलाकार रामायण महाभारतातल्या कथांनी मंदिरांच्या भिंती जिवंत करू शकले. माझ्या माहितीप्रमाणे ओरिसातलं सर्वात जुनं परशुरामेश्वर मंदिरदेखील अशाच उत्तम कलेचा नमुना आहे. उत्तरेकडे राजकीय अस्थिरतेला मंदिरांच्या पावित्र्याचा, सौंदर्याचा उःशाप मिळाला आहे आणि पूर्वेकडे शृंगाराला, आध्यात्माला तिथल्या शांततेचं, सुबत्तेचं कोंदण लाभलेलं आहे. असं म्हणता येईल.
मंदिराच्या बाबतीत संपन्नता बघायची असेल तर मात्र गुजरातशिवाय पर्याय नाही. गुजरातमध्ये अगदी गल्लीबोळातही मंदिर पहायला मिळते. पण ती छोटी मंदिरेदेखील देखणीच असतात. इथल्या सुबत्तेचं प्रतिबिंब इथल्या मंदिरात पहायला मिळतं. भरूचच्या स्वामीनारायण मंदिराबाबत किंवा सोरटी सोमनाथाच्या मंदिराबाबतीत हेच म्हणता येईल. जैन मंदिरांच्या शिखरांवर जशी धर्मध्वजा फडकत असते, तोच प्रकार गुजरातमधील जवळजवळ सर्व मंदिरांमधेही दिसतो. आता जैनांनी ही पद्धत गुजरातमधून घेतली की गुजरातने जैंनाकडून हे माहीत नाही. गुर्जर समाजाच्या रक्तात भिनलेल्या व्यवस्थापन कौशल्याला इथली मंदिरंही अपवाद नाहीत. मंदिर स्वच्छ ठेवणे, गडबडगोंधळ टाळून शांतता राखणे हा ह्या व्यवस्थापनाचाच भाग.
मंदिराच्या हवेशीर बांधकामामुळे मंदिरात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. हिरे, मोती, सोन्याचा मुक्तहस्ताने केलेला वापर, मंदिर तोलून धरणारे कोरीव स्तंभ आणि त्या स्तंभांवरील दर्शनीय शिल्पकृती ह्यामुळे इथली मंदिरं निश्चितच प्रेक्षणीय झाली आहेत.
सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही.

*
मी काही आर्किटेक्चरचा (वास्तुशास्त्राचा?) अभ्यासक नाही आहे, जे मला वाटलं तेच लिहीलं आहे, त्यामुळे काही जागी चुका असतील तर क्षमस्व.

Sunday, November 16, 2014

एक अडनिड गावाची गोष्ट...

दूरवर पसरलेलं जंगल, उत्तरेकडे आई-बापाचे दोन डोंगर, आणि त्या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले, लहानसं, पण तसे संपन्न असलेले गावं! पहाटे पहाटे गावाला जाग यायची ती बिरोबाच्या मंदिरातील ढोलच्या आवाजाने. गाव वसायच्या आधीपासून बिरोबा येथे येऊन बसलेला, आणि बिरोबाच्या आशिर्वादाने हे गाव वसलं असे गावाची जुनी खोडं सांगायची. विजेचे खांब तालुकाच्या गावात कधीच पोचलेले, पण तारा आल्या नसल्यानं, आणि पाटलाला वेळ नसल्यामुळे गावात अजून वीज पोचलेली नव्हती. म्हणून बिरोबाच्या मंदिरासाठी वाण्यानं दान दिलेला स्पिकरचा भोंगा तसाच निपचिप मान टाकून लटकलेला. पण बिरोबाचा पुजारी रोज पहाटे आरती झाली की चांगला अर्धातास ढोल बडवायचा आणि गावाला जाग यायची. शेताकडे जाणारा, नदीकडे जाणारा-जाणारी प्रत्येक व्यक्ती बिरोबाला नमस्कार करूनच पुढे जात असे. त्यांच्या जगण्यात असाधारण असे महत्त्व या मंदिराचे होते. प्रत्येकाने त्याची आपल्यावर कृपादृष्टी असलीच पाहिजे व ती कृपादृष्टी असण्यासाठी त्याला नमस्कार करणे, प्रसाद चढवणे व वेळोवेळी नवस आणि कौल लावणे गरजेचे होते, कारण गावाचा तो जसा राखणकर्ता होता तसाच तो भल्या-बुरयाचां निर्णय घेणारा जागृत देव देखील होता.
गावाच्या वेशीवर असलेल्या बिरोबाच्या मंदिरातून ढोलचे आवाज आवाज येऊ लागले, आणि नेहमीची मंडळी नियम असल्याप्रमाणे मंदिराकडे जाऊ लागली. एक एक करत मंदिराच्या अंगणात असलेल्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमा होऊ लागले. गप्पांचा फड रंगू लागला होता. बिरोबाच्या पुजारी हातात प्रसादाचे ताट घेऊन वडाकडे आला व प्रत्येकाच्या हातात खोबरं ठेऊ लागला. प्रसाद वाटता वाटता पुजारी म्हणाला “पाटील, यंदा देवाची जत्रा एकदम जोरात झाली पाहिजे बरं का!” पाटीलांनी प्रसाद आपल्या कपाळीं लावला व म्हणाले “हो, म्हणजे या, यंदा दणक्यात जत्रा होणार. यंदा देवाच्या क्रिपेने शेतात सोनं पिकले आहे प्रत्येकाच्या. कोणी हात आकडता घेणार नाही, मी शब्द देतो.. काय म्हणता मंडळी?” तेथे बसलेला प्रत्येकजण देवळाकडे तोंड करून दोन्ही हात जोडत म्हणाला “हो, नक्कीच.” पाटलानं आपला हात डोळ्यासमोर धरला व म्हणाला “अरे, तो रम्या हाय का? आवाज द्या रं त्याला.” केश्या जोरात ओरडला “ये, रम्या, इकडे ये. पाटील बोलावत हाईत.” रम्या जवळपास धावत आला व पाटालासमोर हात जोडून म्हणाला “राम राम, पाटील, बोला की” पाटलानं आपल्या खिश्यात हात घातला व पन्नास रुपयाची करकरीत नोट रम्याच्या हातावर ठेवली व म्हणाला “विहारीचा गाळ नीट काढलास नव्हं?” रम्याने ती नोट आपल्या दोन्ही हातात दाबून पाटलाला हात जोडत म्हणाला “होय हो, एकदम तळाचा दगड आणि दगड लक्ख दिसतो बघा.” पाटलाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व पाटील म्हणाला “गड्या, तुझे काम बेसं असतं म्हणून तर तुला सांगितले. पण या पैशाची दारू पिऊ नकोस. पैका जपून ठेव.” रम्या गडबडला, कसं बसं मानेनं हो म्हणत तो निघून गेला व पाटील हताश आवाजात म्हणाला “आपण लई वंगाळ काम केलं, त्याच पापाची फळ आहेत, तरणीताठी पोरं व्यसनाच्या नादी लागली, आपण लई मोठी चूक केली...” मोठी माणसं थरारली, व काहीच न बोलता, एक एक उठून जाऊ लागला व प्रत्येकाची मान खाली होती. पाटलाने बिरोबाला हात जोडले व म्हणाला “देवा, गावासाठी एवढं केलसं, या पापातून गावाला मुक्तीपण दे रे.” आणि पाटील मान खाली घालून चालू लागला.
बिरोबाच्या नावाने भलेमोठं पठार गावाच्या लोकांनी सोडलं होते, तेथे ना कोणी शेती करे, ना खूपच गरज असलेल्या शिवाय त्या देवाच्या जागेत प्रवेश करे. कधी कधी गावची पोरं मात्र, चिंचा, बोरं, कवटी यांच्या नादाने त्या पठारावर मनसोक्त दंगा घालत असत. मग कधी हणम्या त्यांना जोर जोरात शिव्या देत त्यांना पळवून लावत असे. हणम्या, हा गावातलाच, पण त्याची म्हातारी मेली व तो कायमचा बिरोबाचा सेवक झाला. त्याच्यावर देवानं जबाबदारी दिली होती पठार राखायची, पूर्ण गावासमोर देवाला कौल लावला होता, हणम्या देवळात सेवक म्हणून राहणार की पठार संभाळणार, दिला देवानं कौल, तेव्हा पासून तो पठार संभाळतो.
रम्याला आज पाटलानं पैसे दिले होते, त्यानं पाटलाच्या विहीरीचा गाळ काढून दिला होता, रम्या मजेत होता, खिश्यात पैसा खुळखुळत होता, रम्या मनातल्या मनात म्हणाला “आयला, आज जाता जाता हणम्याला पण तालुक्याला घेऊन जायचे, मस्तपैकी पहिल्या धारेची मनसोक्त प्यायची व उरला पैका तर उद्याच्याला म्हणून सोबत घेऊन यायची. हणम्या जेव्हा जेव्हा दारू मिळाली तेव्हा तेव्हा आपल्याला बोलावून दारू पाजली गड्याने. आज मोका हाय, त्याला पण पाजू.” रम्या झापाझाप रान तुडवत, पठारावर पोचला व टिपेच्या आवाजात ओरडल्या “ अरे, हणम्या, रांडेच्या कुठे आहेस रे!” पठारावर त्याचा आवाज दूरवर पोचला, पण हणम्याची परिचित अशी शिळ काय आली नाही. रम्याला आधीच तालुक्याला जाण्याची घाई झाली होती, तो हणम्याच्या नावाने शिव्या घालत, त्याला शोधू लागला. पठारावर भलं मोठं असलेलं चिंचे झाड, त्या दिशेने रम्या गेला, आणि त्याने पाहिले कि, त्या झाडाच्या बुध्यांलगत हणम्या तोंड वासून जमिनीवर उताणा पडला.. रम्या हणम्याला उन्हांतानात शोधात शोधात चिंचेच्या झाडाजवळ आला आणि..समोर हणम्या हा असा आडवा.. रम्या स्वत:शीच बोलल्यागत म्हणाला “च्यामायला, रांडेच्याला दारू कुठून मिळाली? आणि मिळाली तर मला का नाही पाजली? भोसडीच्याच्या गांडीला लै माज आला आहे आजकाल..” असे म्हणत रम्या त्याच्या जवळ जाऊन बसला आणि त्याला हलवत म्हणाला “ये हणम्या, रांडेच्या तुला कुणी दिली रं दारू?” पण हणम्याने काही उत्तर दिले नाही. रम्याने हणम्याला निरखून पाहिले.. आणि दचकून एकदम उभा राहिला. हणम्याचे डोळे उघडेच होते, वर चिंचेच्या झाडावर एक टक बघत असल्यागत! हिंमत करून रम्याने त्याच्या नाकाजवळ बोटं नेलं, काहीच हालचाल जाणवली नाही, तेव्हा त्याने जोरात बोंब मारली... “हणम्याssssssssss! अरा अरा देवा हे असं कसं झालं... त्यांनीच त्यांनीच मारला हणम्याला!!!” असे म्हणत तो गावकडे तोंड करून बोंबलत पळू लागला. धापा टाकत कसाबसा वेशीजवळ पोचल्या पोचल्या हणम्या जोरात ओरडला “चोराच्या भूतानी हणम्याचा पण जीव घेतला!” आणि रम्या धापकन जमिनीवर कोसळला.
गावातली चार-पाच तरणी पोरं धावत धावत पठारावरील चिंचेच्या झाडाखाली पोचली व, हणम्याला उचलून बिरोबाच्या मंदिरासमोरील पारावर त्याला झोपवला. वैदूबुवा धावत पोचले व त्यांनी हणम्याचा हात हातात घेतला व थोड्या वेळानं म्हणाले “हाय, थोडा जित्ता हाय यो. अरं कोणती पळत जावा आणि माझा घरातून माझं औषधाचे गाठोळ घेऊन या रं!” तडकाफडकी दोन पोरं वैदूबुवाच्या घराकडे पळाली. इकडे वैदूबुवा कधी हणम्याचे तळहात चोळत होते, तर कधी छाती. गेलेली पोरं लगेच पळत आली व त्यांनी गाठोळ वैदूबुवाच्या हाती दिले. वैदूबुवा लगेच २-३ पाला एकत्र करून त्याचा रस काढू लागले आणि रम्याने खूप वेळ मनात दाबून ठेवलेला प्रश्न वैदूबुवाला विचारला “वैदूबुवा, हणम्यानं दारू पिली हाय काय?” वैदूबुवाने रम्याकडे पाहिले व म्हणाला “नाय, पण पाटलाला बोलवा. लगेच या म्हणावं.” रम्या जागच्या जागी थिजला होता व तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो म्हणाला “म्हणजे, चोरांच्या भुतांनी.......” तोच वैदूबुवा परत ओरडले, “अरे जा, आधी पाटलाला बोलवा.” तसा रम्या पळाला, पाटलांच्या घराकडे. वैदूबुवाच्या चमत्कारानं हणम्याचा गेलेला श्वास जसा काय परत आला होता, पण हणम्याला दातखिळी बसली होती. वैदूबुवाने अनंत प्रयत्न करून कसाबसा त्याला शुद्धीत आणला आणि जवळपासं आखं गाव एकदम बोललं “हणम्या, मर्दा झालं काय होतं?”
रम्या पाटलाला घेऊन मंदिराच्या आवारात आला, आणि पाटील ओरडले “अरे, त्याला हवा लागू द्या, व्हा बाजूला.” तसा हणम्याच्या भोवती जमलेला जमाव झरकन बाजूला झाला. पाटील पारावर बसत म्हणाले “वैदूबुवा, आता काय परिस्थती? दारू पिली असेल फोद्रीच्याने. देवाचं काम करतो तरी. लाखवेळा बोललो, गड्या देवाचं काम करतोस तू, कश्याला देवाचा कोप होईल असलं वागतोस ऑ.” पण हणम्या पाठोपाठ वैदूबुवा पण मान हलवत म्हणाले “पाटील, यानं दारू नाही पिली. काय झालं आता तोच सांगेल.” हणम्या अजून भेदरला होता, पारावर आडवाच होता, आणि थोड्यावेळाने त्याच्या तोंडातून असप्ष्टसा असे म्हणाला “मी बदला घेणारं, तुमच्या गावचा मी बदला घेणारं” असं म्हणून हणम्या परत शुद्ध हरपून बेशुद्ध झाला. पण जवळ बसलेल्या पाटलाला मात्र पूर्ण समजलं, तो काय म्हणाला ते. मानेच्या मागून थंड घामाचा ओघळ पाटलाच्या पाठीपर्यंत पोचलेला पाटलाला जाणवला व हातापायाला त्याच्या कंप सुटला. कसाबसा धीर गोळा करत पाटील दबक्या आवाजात म्हणाला “आज, सांजच्याला आपण येथे एक बैठक करू. घरटी किमान एकतरी माणूस इथं पाहिजेच पाहिजे. बायका, पोरं घेऊन येऊ नका.” असे म्हणत, पाटील कपाळावर आलेला घामाचा ओघळ झटकत, पटकन उठला, व ताडताड मंदिराकडे गेला, आणि बिरोबासमोर साष्टांग नमस्कार घातला.
दुपार टळायच्या वक्ताला, हणम्या शुद्धीत आला होता. हणम्याने डोळं किलकिलं करून पाहिलं तर आजूबाजूला पुजारी, वैदूबुवा, रम्या, पाटील बसलेले त्याला दिसले तसं त्यानं रम्याचा हात हातात घेतं म्हणाला “रम्या, मर्दा, आपलं काय खरं नाय. ते आपल्याला बी मारणार, अगदी तसंच.” असं बोलून त्यानं हंबरडा फोडला. हणम्याला छातीशी धरून रम्यापण मुसमुसू लागला, तोच पुजारीने बिरोबाचा अंगारा हणम्याच्या कपाळावर चोळला व म्हणाला “शांत हो, शांत हो. आता निवांतपणे सांग काय झाले, काय पाहिलेस तू? हणम्या. तुला कळतय ना मी काय विचारतो आहे ते?” असं म्हणत पुजारी कुठलेसे मंत्र पुटपुटु लागले. हणम्याने पाटलाचे पाय धरले व म्हणाला “पाटील, वाचवा. ते जीव घेणारं माझा.” पाटलाच्या पोटात विहिरीएवढा मोठा खड्डा पडला व पाटील कसाबसा बोलला... “अरं, मर्दासारखा मर्द तू. आणि असा बाईसारखा रडतो आहेस? धीर धर काढू काय तरी मार्ग. मी सांजच्याला गावाला बोलावलं हाय इथं. मार्ग काढू आपण. पण आधी तू सांग काय झालं चिंचेच्या झाडाखाली?” चिंचेच्या झाडाचे नाव कानावर पडतातच हणम्याने डोळं गरारा फिरवले आणि तो परत बेशुद्ध पडला.
*
बिरोबा मंदिरासमोरील पारावर पाटील, पुजारी, वैदूबुवा बसलेले होते, शेजारी हणम्या अजून अर्धवट शुद्धीत आडवा होता, रम्या त्याच्या शेजारी बसला होता व सर्वांच्यासमोर गावातील झाडून सारी पुरुष मंडळी बसली होती, शून्यात नजर लावून. पाटलाने घसा खाकरला व अपरिचित अश्या घोघऱ्या आवाजात म्हणाला “मंडळी, गेल्या काही महिन्यात जे काही घडले, याचा आपल्याला खूप त्रास झाला. गावातील तरणीताठी अशी पाच पोरं गेली, तीन गर्भार बायका गेल्या, आज हणम्याचा जीव जाता जाता राहिला. हणम्या तर देवाचा सेवक. पण त्याला देखील ते सोडत नाही आहेत. यावर काय तरी उपाय गेला पाहिजे. नाही तर गावाचं अस्तित्वच धोक्यात येईल.” तोच गर्दीतून एक म्हातारा पण खणखणीत आवाज आला “पण विडीचे चटके देऊ म्हणत पुढे येणारा हाच, हाच तो हणम्या होता. केलेल्या पापाची फळं आपल्या सगळ्यांना येथेच भोगायची आहेत पाटील..” असे म्हणत तो म्हातारा खदाखदा हसू लागला.. आपले हसू आवारत, तो म्हणाला “मी म्हणालो होतो तेव्हा पण, काय बी करा, पण अशी अभद्र शिक्षा नगा करू त्या पोरांना. माझा काशी तर त्या दिवशी गावात पण नव्हता, पण हकनाक गावाच्या पापाचं फळ म्हणून पहिला बळी त्याचाच गेला. झाडावरून पडायचे काय त्याचे वय होते? मरायचे काय त्याचे वय होते?” असं म्हणून हसता हसता तो म्हातारा घाय मोकळून रडू लागला. तोच अजून एक पोरसवदा आवाज आला “अरे खोता, पेटवा पेटवा म्हणून तूच आधी बोंबलला होतास. इसरलासा?” हळू हळू आवाज वाढू लागले, प्रत्येकजण दुसरा कसा दोषी हेच सांगत होता. ढिल्या अंगाने बसलेला पाटील, हे सगळं पाहून पारंच ढेपाळला. पुजारीकडे हताश नजरेने पहात त्याने, आता तुम्हीच बघा असा इशारा केला... पुजारी उठला व जोरात ओरडला “गप्पा, बिरोबाची शपत हाय, पाटीलाचे बोलणं होऊ पर्यंत मध्ये जो तोंड उघडेल तो मुक्का होईल. कायमचा!” गप्प करून समोरचा जमाव शांत झाला व पाटील पुन्हा बोलू लागला “बघा, जे झालं ते झालं, आज एकमेकाला टोचून काय मिळणार. पण समोर उभं असलेलं संकट दूर कसं करायचं याचा इचार नको का करायला?” समोरचा जमाव चुळबुळ करू लागला, ते ध्यानात आल्यावर पाटलानं पुजारयाकडे एक नजर टाकली व पुजारी पटकन उठाला व म्हणाला “बिरोबाची शपथ मागे घेतो, पण वंगाळ काय बोलायचे नाही, मुद्दाचे बोला फक्तं!” असे म्हणून पुजाऱ्याने बिरोबाकडे तोंड करून हात जोडले. गावातला सगळ्यात म्हातारा असा सुतारआज्जा उभा राहिला व सगळ्यांकडे नजर फिरवत शांतपणे म्हणाला “बघा पाटील, मी सांगतो तुम्ही जावा तालुक्याला. शोधा कोणीतरी मांत्रिक-तांत्रिक. इशय आता तुमच्या बी हातात नाय ना या बिरोबाच्या. त्यांनी मरताना बिरोबाचीच शपथ घेतली होती, आठवतंय ना?” असं म्हणत तो म्हातारा थरथरत बसला, पण गावाच्या प्रत्येक माणसांच्या कानावर ते शब्द पडू लागले “मी चोर नाय, पण या बिरोबाची शपथ, मी गावाचं वाटोळं करेन, इथं मशान असेलं मशान, घरटी एक माणूस मारेन मी!” एक एक करत सगळे गप्पं गुमान उठू लागले, पाटील थिजल्यागत तेथेच बसून होता, पुजारी अगतिकतेने कुठलेसे मंत्र पुटपुटू लागला व वैदूबुवा आता काय हे प्रश्न चिन्ह चेहरयावर घेऊन पाटलाकडे आशेने पाहू लागले, पाटील थोड्या वेळात बोलला “मी जातो उद्या, तालुक्याला.” हताशपणे प्रत्येकजण उठला पण जाताना, चिमूटभर बिरोबाचा अंगारा न विसरता प्रत्येकजण सोबत घेऊन जात होता. थोड्यावेळात तेथे भयाण शांतता पसरली व निवांत बेशुद्ध असलेल्या हणम्याचा राखणदार मित्र रम्या, बिरोबाचा अंगारा हातात घेऊन दूरवर दिसत असलेल्या पठारावरील चिंचेच्या झाडाचे टोक पाहत तसाच बसून होता.
पुजारी पाहटच्या पहिल्या वक्ताला, मंदिराकडे निघाला होता, मंदिराकडे पोचल्या पोचल्या त्याने पारावर नजर मारली तर, रम्या हणम्या शेजारी बसून होता, पुजारीने मंदिरातून आवाज दिला “रम्या, जा पोर, घरी जाऊन आवरून ये. मी पोचलो हाय मंदिरात.” थोडा वेळ उत्तराची वाट पहात पुजारी जागेवर थबकला पण रम्याकडून काहीच उत्तर आले नाही. पुजाऱ्याने मंदिराचे आंगण झाडले व सहज नजर पारावर टाकली तर रम्या अजून तसाच बसला होता. पुजारीने हातातील खराटा टाकला व हळू हळू पाराकडे जाऊ लागला व जाता जाता तो रम्याला आवाज देत होता “अरे, रम्या, रम्या?... रम्या बसल्या बसल्या झोपलास काय रे? हणम्या? कशी आहे रं तुझी तब्येत?” पण उत्तर कोणीच देत नव्हते. पुजारी पाराजवळ पोचला व त्याने रम्याला हाथ लावला तसा रम्या, धाडकन आडवा पडला. पुजार्याला काही सुचायच्या आत त्याची नजर हणम्याकडे गेली, तर हणम्याचे डोळे पांढरे झालेले. त्याच वेळी त्याने रम्याकडे पाहिले तर रम्याचे डोळे सताड उघडे होते, व चेहऱ्यावर भयंकर काहीतरी दिसल्याचे भाव... पुजारी धावत पळत ढोलजवळ पोचला व वाटेल तसा जमेल तसा दोन्ही हाताने ढोल वाजवू लागला. नादमय ढोलच्या स्वराची सवय असलेले गाव अश्या विचित्र ढोलच्या नादाने धडपडत जागे झाले व जो तो बिरोबाच्या मंदिराकडे धावू लागला, तालुक्याला जायचे म्हणून लवकर उठलेला पाटील सुद्धा!
*
हणम्या आणि रम्याची चिता धडाडत पेटली होती, अगतिकतेने सारं गाव त्या चितेकडे डोळे सताड उघडे टाकून पाहत होते. बळीवर बळी ते घेत होते, पण आधी गावाच्या वेशीभायेर असलेलं भय आता गावाच्या जागृत बिरोबाच्या मंदिरापर्यंत पोचलं होते, म्हणजे आता त्यांचा वावर गावभर होता? असला प्रश्न चेहरयावर घेऊन प्रत्येकाचे डोळे त्या दोन चिता पहात होत्या. पाटलाच्या मनात वादळ उठलं होते, तो समोर जळत असलेली चिता पाहून सैरभैर झाला होता व पुजारयाचा हात हातात धरून तो जोरात ओरडला “असा देवानं कौल का दिला?????” धडधड जळत असलेली चिता बघायचे सोडून पूर्ण गाव आता पाटील व पुजारीकडे पाहू लागले व प्रत्येकाच्या नजरा हाच प्रश्न पुजाऱ्याला विचारात होत्या. पुजाऱ्याने लोकांच्या नजरा ताडल्या व पटकन तो पाटलाला म्हणाला “वेळ नका दडवू, तुम्ही निघा. पोचा तालुक्याला, आणि बोलावून घेऊन या धर्माबाबाला, आता तोच यातून मार्ग काढेल. जावा तुम्ही. निघाच.” जमावातून पण काही अस्पष्ट पण अगतिक असे आवाज आले की “पाटील, जावा लवकर. नाहीतर उद्या कोणाची चिता येथे.....” पाटील खांदे पाडून मागे वळला व पाय ओढत ओढत तो तालुक्याच्या दिशेला निघाला.
चार तास चालून पाटील तालुक्याला पोचला होता, धर्माबाबाची झोपडी शोधायला त्याला जास्त त्रास नाही झाला पण धर्माबाबा झोपडीत नव्हता. काय करायचे हा विचार करत पाटलानं गंजीफ्रोकात हात घालून विडीचे बंडल काढलं आणि एक विडी पेटवली. तासाभरानं धर्माबाबा त्याला येताना दिसला व रिकामं झालेले बिडीचे बंडल त्याने दूरवर फेकत दोन्ही हात जोडून उभा राहिला व धर्माबाबा समोर येतं त्याच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला “पापी!” तसा पाटील चमकला व त्याने धर्माबाबासमोर लोटांगण घातले व म्हणाला “बाबा, वाचावा!” धर्माबाबाने त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि आधी आपल्या धुनीत तूप ओतलं! जसं तूप आगीवर पडलं तसं जोरात भडका उडाला व त्या तांबडया भडक उजेडात धर्माबाबाचा चेहरा अजूनच भयंकारी दिसू लागला. पाटील कसाबसा स्वत:ला सावरत धर्माबाबाच्या झोपडीत शिरला व धर्माबाबासमोर हात झोडून, मान खाली घालून बसला. तोच धर्माबाबा कडाडला “तुम्ही, निष्पाप लोकांचा जीव घेतला, अघोरी, अघोरी पद्धतीने. बोल खरं आहे की नाही?” पाटलानं फक्त मान डोलावली ती होकारार्थी कि नकारार्थी हे पण त्याच्या ध्यानात आले नाही, पण पाटलाच्या घश्यातून विरळ असा आवाज आला व तो म्हणाला “बाबा, वाचावा. चूक झाली.” धर्माबाबाने नकारार्थी जोरजोरात मान हलवली व तो म्हणाला “तुझ्या मागोमाग ते पण येथे पोचले आहेत, ते बघ तुझ्या मागेच ते उभे आहेत... मला दिसत आहेत. त्यांना न्याय पाहिजे व तुला बचाव. सांग कोणाच्या मागे मी जाऊ सांग...” असे म्हणत धर्माबाबाने आगीत काहीतरी टाकले व पुन्हा समोरील धुनीतून जोरदार ज्वाळा उफाळून वर आल्या. पाटील दिसत नसलेल्या त्यांना व बाबाला उद्देशून एकत्रच म्हणाला “आम्ही चुकलो, आमची चूक झाली, गैरसमज होता हो.. आम्हाला माफ करा पण या चक्रातून आम्हाला काढा. मी, माझं गाव गुन्हेगार आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा? सात तरणी पोरं, आणि दोन गर्भार स्त्रियांचा जीव गेला आहे, अजून किती बळी??? “ आणि पाटील घाय मोकलून रडू लागला, तोच धर्माबाबा त्याला दरडावत म्हणाला “ ते म्हणत आहेत, त्यावेळी तुझी का वाचा बसली होती, पाटील? तू का आम्हाला वाचवले नाहीस? आता आम्ही आमची शपथ पूर्ण करणारच. उद्याच तुझ्या पोरांची बारी हाय, लई जीव हाय नव्हं तुझा पोरावर?” आपल्या पोराचं नाव आल्या आल्या पाटील जमिनीवर कोसळला व ओरडला “धर्माबाबा, वाचावा माझ्या पोराला...” धर्माबाबाने समोरच्या धुनीत पुन्हा काही तरी टाकले व उफाळलेली ज्वाळा शांत शांत होत, धुनीवर पसरली व धर्माबाबाचा हलकासा आवाज आला, “पाटील, हे सगळं हाताबाहेर गेलं आहे. मी येतो तुमच्यासोबत गावात. पण माझी व्यवस्था मी सांगतो तशीच झाली पाहिजे, मी यातून तोडगा काढेनच असे नाही, या प्रयत्नात माझापण जीव जाईल कदाचित. पण मी जो मार्ग सांगेन तो तुम्ही कराच. महत्त्वाची गोष्ट, सर्वात प्रथम गावच्या वेशीच्या अलीकडेच मला पूर्ण सत्य माहिती हवे आहे, नेमकं काय घडलं, गावासोबत आणि त्यांच्या सोबत!” धर्माबाबाने धुनीवर हात फिरवत इकडे तिकडे बघत एक वाक्य उच्चारले “हे, बघा मी चाललो आहे त्या गावात. मला नेमकं कळू द्या. काय झालं. तो वर तुम्ही शांत रहा .तुम्हाला काय बळी हवा तो तुम्ही घेतला आहेच.. अगदी ताजा ताजा तुम्ही घेतला आहे, दोन दोन बळी. आता काही दिवस शांत बसा. मला माझे काम करू द्या, किमान काही नाहीतर मी तुम्हाला तरी मुक्त करेन, याचे वचन देतो.” त्या छोट्याश्या झोपडीत हलकंसे जोरात वारं वाहिले व एक अस्पष्ट असा आवाज धर्माबाबाच्या कानावर आला “आम्हाला, मुक्ती नको आहे, आम्हाला बळी हवा आहे.... ज्यांनी आम्हाला येथे पोचवले त्यांना सोबत घेऊन जाणार आहोत आम्ही.. पण तुम्ही प्रयत्न करणार तर करा आम्ही मध्ये नाही येणार, पण आमचे लक्ष वेशीवर आहे” धर्माबाबा पण क्षणभर थरारला पण, अगतिक पडलेल्या पाटीलाच्या कपाळावर हात फिरवत म्हणाला “पाटील, अजून खूप भोगायचे आहे. थारयावर या. मन निष्टुर करा. आता आपण निघू. जाताना मला सर्व काही सांगा अगदी एक एक गोष्ट! नेमकं काय घडले?”
धर्माबाबानं गरजेचे सामान बांधले व तो पाटलाच्या मागे मागे चालू लागला व पाटील त्याला काय घडलं हे सांगू लागला. “धर्माबाबा, मागच्या दिवाळीची गोष्ट आहे, थंडी हळूहळू पसरत होती, पिकपाण्यानं सगळं गाव आनंदात होते, पण जे आज पर्यंत गावात कधी घडलं नव्हतं असे काहीसं घडलं. आधी आम्ही किरकोळ गोष्ट म्हणून दुर्लक्ष केलं पण, सुताराच्या घरी एका रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी सुताराची सगळी हत्यारं पळवली, नंतर चोरी देसाईवाण्याच्या घरात झाली, नंतर परत चोरी चंद्रा सोनारयाच्या घरात झाली, झाडून घरात होतं नव्हतं ते, चोरून नेलं. गावाचचं गहाण असलेलं सोनं पण चोरीला गेलं तरी गाव शांत होतं, पण एक दिवशी चोरांनी बिरोबाच्या मंदिरावर डल्ला मारला. त्या दिवशी पोर्णिमा होती, गाव शांत झोपलं असताना अचानक खन्न करून घंटीचा आवाज झाला तो आज बिरोबाच्या मंदिरातील घंटीचा होता, एक एक करत आसपासची लोकं जागी झाली, आणि वेशीबाहेर पाठीवर ओझं घेऊन पळत असलेली काही आकृत्या दिसल्यावर गावभर कल्ला झाला, अनेक मशाली पेटल्या... आणि एक मोठा आवाज सगळा परिसरभर पसरला “अरं चोरांनी बिरोबांला पण लुटला!” छोट्या-मोठ्या चोऱ्यांनी त्रस्त असलेल्या गावाच्या मनावर यापेक्षा मोठा घाव दुसरा कुठला असणार? जो बिरोबा गावाचे रक्षण करतो त्याच बिरोबाला लुटला होता त्या चोरांनी.” पाटील क्षणभर थबकला व समोर दूरवर बोट दाखवत म्हणाला “ते बघा धर्माबाबा, बिरोबाचे पठार आणि ते ते.. चिंचेचे झाड... “ धर्माबाबाने तिकडे पाहिले व तो थबकलाच व म्हणाला “पाटील गाव राहू दे, आधी आपण त्या चिंचेच्या झाडाकडे जाऊ या.” पाटलाच्या अंगाचा थरकाप उडाला व तो घाबरत म्हणाला “तिकडे? नको, धर्माबाबा, आधी आपण गावात जाऊ या.... तिकडे ते असतील.”
धर्माबाबा गावाच्या वेशीवर पोचला व एकदम बसकण मारून तो म्हणाला “आधी गावं बांधावं लागेल मला, आधी वेश बांधावी लागेल मला. पाटील, तुम्ही येथेच थांबा व गावातला कोणीतरी बोलवा व येताना त्याला सांगा बिरोबाचा अंगारा अगदी मिळेल तेवढा घेऊन ये!” पाटलाने जीवाच्या आकांताने आवाज दिला “रम्या...........” तोच जीभ चावत पाटीलाने परत आवाज दिला “चिंट्या, लवकर इकडे ये, येतानं बिरोबाचा अंगारा भेटेल तेवढा गोळा करून ये, चिंट्याsssssssssss! मंदिराच्या शेजारी असलेल्या झोपडीतून चिंट्या कसाबसा धावत निघाला व मंदिरातून अंगारा गोळा करून तो पाटलाकडे धावत पोचला व समोर अगतिक पाटील व जमिनीवर बसलेला धर्माबाबा पाहून त्याचा उरला-सुरला धीर देखील सुटला व तो पाटलाच्या मागे थरथरत उभा राहिला व पाटलाने कशीबशी त्याच्या हातातून बिरोबाच्या धुनीतील राख काढून धर्माबाबाच्या समोर ठेवली. ती राख आपल्या हातात धरून धर्माबाबा बोलला, “पाटील, पुढे काय झालं?” असं म्हणत त्यांने हातावरील अंगारावर फुंकर मारली व परत बोलला, पाटील जास्त वेळ नाही, आपल्याकडे आता, ते आत गावात आहे..” पाटलानं आवंढळ गिळला व पूर्ण जोर लावत तो पुन्हा बोलू लागला.
“त्यांनी आमचे दैवत बिरोबाचे मंदिर लुटले होते, अंधारात कोण कोठे पळालं याचा सुगाव लागला नाही, पण तिकडे दूरवर बिरोबाच्या पठारावर कोणीतरी आहे असा भास झाला व सगळे गाव धावत तिकडे पळाले. पठारावर चिंचेच्या झाडाजवळ ती तीन लोक वस्तीला आलेली दिसली. त्यांच्याकडे चूल होती, दोनचार भांडी होती, त्यांना आम्ही इचारले ‘कोण तुम्ही’, तर म्हणाले आम्ही प्रवासी आहोत, तालुक्याला निघालो होतो, रात्र झाली म्हणून इथं डेरा टाकला, सकाळी निघू... असे ते म्हणाले, पण हणम्याला जोर चढला होता, तो बोंबलला, आधी त्यांचा तपास करा, साले कुतरडे, रांडेचे चोरासारखे दिसतात, आधीच गाव पिसाळलेले होते, आणि तपासात त्यांच्याकडे मुठभर सोनं सापडलं. ते सांगत होते, तालुक्याला चाललो आहोत. देवाची मूर्ती करायला.. त्यांच्या गावाच्या देवाची मूर्ती. पण तोच काशीची बायको ओरडली, अगं बाई... हे तर अगदी आमच्या सासूबाईच्या गंठणासारखं दिसतं आहे, आणि क्षणात उद्रेक झाला!” पाटील क्षणभर थबकला व पुन्हा मागे वळून चिंचेच्या झाडाकडे पहात म्हणाला “हे सर्व तेथे, त्या झाडाखाली घडलं होतं. गावातील प्रत्येक आणि प्रत्येकजण चिढलेला होता. त्यांनी त्या पोरांना चिंचेच्या झाडाभोवती बांधले, त्यात हणम्या, रम्यासारखी बाकीची अनेकजण होती, ज्यांनी आधी शिव्याचा भडीमार केला, पण ती पोरं तेच सांगत होती, जे त्यांनी आधी सांगितले, पण गावावर जसं गारुड झालं होते, सगळेच पिसाळले होते, तोच हणम्या पेटती बिडी घेऊन त्यांच्या जवळ गेला व म्हणाला, अरे, रांडेच्यानो, बिरोबाला लुटता.. असे म्हणत त्याने पहिला चटका एकाला दिला तो कळवळला व जोरात ओरडला, सोडा आम्हाला, आम्ही नाही केली चोरी कुठे, आमच्या गावात माणूस पाठवा. आमच्या गावात विचारा सोनं कोणाचं आहे आमच्याकडे. पण त्यांच्याकडे बोलण्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते, हणम्याच्या पेटलेल्या बिडीला वातीसारखा वापर होऊन अनेक बिड्या पेटल्या होत्या, त्या पोरांच्या अंगावर नको तेथे, बिड्याचे डाग दिले जात होते, बिडीच्या चटक्याचे एक वैशिष्ठ असते, त्वचेवर बिडी वीजवली तर ती अंगार आताच सोडते, आणि तीळतीळ मरणासारखा एक एक तुकडा ज्याच्या शरीरात ती बिडी घुसली आहे, त्याला क्षणाक्षणाला शेकडो मृत्यू सारखा असह्य त्रास देत असते. हे घडत असतानाचं सुतारानं जळतं लाकूड आणलं आणि त्या मुलांच्या मांडीवर चटके द्यायला सुरवात केली, ती पोरं किंचाळत होती, ओरडत होती, पण तो उन्माद गावाचा टोकाला पोचला होता, खोताच्या म्हातारयाने त्या पोरांच्या अंगावरील कपडे फाडले व थरथरत्या आवाजात तो म्हणाला, प्रत्येक घरातून एक जळतं लाकूड आलंच पाहिजे..., एक एक करत अनेक घरातून जळतं असलेल्या लाकडांचे ढीग जमा होतं गेले, ती पोरं जीवाच्या आकांताने ओरडत होती, बिरोबाची शपथ, आम्ही नाही केली चोरी..... पण कोणापर्यत तो आवाज पोचलाच नाही...” धर्माबाबाने रागाने पाहिले, आणि पाटील घाबरत म्हणाला “शेवटचं काम माझा मुलानं केलं त्याने घरातील, ताज्या तुपाची बरणी त्यांच्यावर फोडली!” धर्माबाबानं डोळे मिटले व एवढेच म्हणाला “पुढे” पाटलाने कसाबसा श्वास घेतला व म्हणाला “त्यातील एक जळताना, रागाने म्हणाला ‘मी चोर नाय, पण बिरोबाची शपथ, मी गावाचं वाटोळं करेन, इथं मशान असेलं मशान, घरटी एक माणूस मारेन मी!’ धर्माबाबा हेच घडलं” असं म्हणून पाटील जमिनीत नजर गाडून दगडासारखा निशब्द झाला.
धर्माबाबानं बिरोबाचा मुठभर अंगारा एक मोठ्या घाघरभर पाण्यात टाकला व आपल्याकडील कसलीशी राख पण त्याने त्या घाघरीत टाकली व चिंट्याच्या हातात देत म्हणाला, “जा! गावाच्या चारीबाजुला हे पाणी शिंपडून ये, जा लवकर.” चिंट्या घागर घेऊन पटापट पाणी शिंपडत गेला. धर्माबाबा पाटीलाला म्हणाला “पाटील, धीर धरा. आज रातच्याला पूजा करेन मी, महारुद्राची..” धर्माबाबानं आपलं साहित्य बिरोबाच्या पठारावर त्याच चिंचेच्या झाडाखाली मांडले, तात्पुरता निर्माण केलेला अग्नीकुंड धगधगत होता, धर्माबाबा जोर जोरात महारुद्राला आव्हान करत होता, तोच विकटहास्य धर्माबाबाच्या कानावर आपले तसे धर्माबाबानं आपलं डोळे उघडले.. समोर ती तीन पोरांची भूतं बसली होती व ती धर्माबाबाकडे बघून हसत होती. त्यातील एक म्हणाला “धर्माबाबा, तू काय बी कर, घेतलेली माझी शपथ मी पूर्ण करणारच. गावातील घरटी एक माणूस मरणारच.” असं म्हणून तो धर्माबाबाकडे रागानं बघू लागला, तोच दुसरा म्हणाला “धर्माबाबा, जिवंत असताना बिडीचे चटके, ते पण थोबाडापासून पायाच्या बोटापर्यंत सगळीकडे कधी खल्ले हायत का? जिवंत जळताना होणारी तडफड कधी अनुभवली हाय तुम्ही? आमचा बदला आम्हाला घेऊ द्या, आम्ही तुम्हाला काय बी करणार नाही..” धर्माबाबा शहारला होता, पण कसंबसं धीर गोळा करून धर्माबाबा बोलला “पोरांनो, तुमच्यासोबत लई वंगाळ घडलं, तुमचा हक्कपण हाय बदला घेण्याचा. पण ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला जिवंत जाळले, त्यांना तुम्ही धडा शिकवला आहेच कि, बाकीच्यांना जीवदान द्या एवढंच माझं मागणे. तुम्हाला कैद करून बाटलीत ठेवण्यापेक्षा तुम्हाला मुक्ती मिळावी म्हणून मी पूजा करेन, बिरोबाची शपथ!” तिसरा जोरात ओरडला “नाय, कधीच नाय!” धर्माबाबा हताश पहात बसला, समोरून ते कधी व कुठे गेले याचा पत्ताच धर्माबाबाला लागला नाही. संध्याकाळ सरून केव्हाच रात्र झाली होती. त्या निरव पठारावर, शांत असलेल्या चिंचेच्या झाडाखाली विजत आलेल्या अग्नीकुंडासमोर धर्माबाबा समाधी लावून बसला होता व ती तीन भूतं, चिंचेच्या झाडाच्या एक भल्या मोठ्या फांदीवर बसून टक लावून धर्माबाबा काय करतो हे पाहत होते. एकाचे डोळे चकाकले, तो सरळ धर्माबाबासमोर गेला....
सकाळच्या पारी पाटील, लगबगीने धर्माबाबाकडे आला व धर्माबाबासमोर हात जोडून बसला. धर्माबाबानं डोळे उघडले व पाटीलांकडे डोळे रोखत धर्माबाबा एका बाटलीकडे बोट दाखवत म्हणाला “त्यांना बाधून टाकलं हाय, आणि त्यांनी गावाला अभयदान द्यायचं मान्य केलं हाय. त्यांच्यासाठी गावात बिरोबा मंदिरात एक पूजा घालायची येत्या अमावश्येला. म्हणजे परवा रातच्याला. गावातील झाडून सगळी माणसं हजर हवीत. आजच गावात बातमी द्या, सगळ्यांना. पूजा झाल्यावर यांना मुक्ती मिळेल, सगळ्यांनी प्रार्थना करायची हाय.” पाटील भलताच आनंदाला, त्यानं जमिनीवर लोटांगण घातलं व धर्माबाबाचे पाय धरून म्हणाला “तुम्ही मला, माझ्या गावाला वाचवलं, आम्ही जन्मभर तुमचं हे उपकार नाई विसरणार.” असं म्हणून पाटील धावतच गावाकडे निघाला, त्याच्या पाटमोऱ्या आकृत्तीकडे पहात धर्माबाबा तेथेच बसून राहिला, व चिंचेच्या झाडाच्या त्या भल्यामोठ्या फांदीवर आपली नजर टेकवून, एवढंच म्हणाला “बिरोबा, जशी तुझी इच्छा!”
बिरोबाच्या मंदिराजवळ संध्याकाळ होताच गाव जमू लागले, आज आमावस, धर्माबाबा पूजेच्या लगबगीत होता व गावाचा पुजारी त्याला मदत करत होता. पूर्ती रात्र पडताच, धर्माबाबानं पूजेला सुरवात केली. पारावर पाटील आणि त्याच्या शेजारी त्याचं भेदरलेलं पोरगं बसलं होते, २४-२५ वर्षाचा गडी, भिजल्या मांजरासारखा अंग चोरून बसला होता, हळूच जमेल तस्म इकडे तिकडे पाहत होता, जरा जरी पानांची सळसळ कानावर आली कि दचकून उठायचा आणि परत बापाचा हात घट धरून बसायचा. इकडे धर्माबाबाची पूजा शिगेला पोचली तशी धर्माबाबानं, पाटलाला आणि त्याच्या पोराला पूजेजवळ बोलावलं. ते जवळ येऊन बसताच धर्माबाबा जोरात गावाला उद्देशून म्हणाला “हे बघा, गावच्या हातून लै मोठं पाप घडलं, आणि अनर्थ झाला, निषाप पोरांचा हकनाक जीव तुम्ही घेतला, त्यांनी त्याचा बदला पण घेतला, आज त्यांनी तुम्हाला क्षमा केली, आता तुम्ही सर्वांनी मोकळ्या मनानं त्यांच्याकडे क्षमा मागा व क्षमा दिल्याबद्दल त्यांचे आणि बिरोबाचे आभार माना.” असं म्हणताच सारं गाव उभं राहिलं आणि त्यांनी डोळे मिटले व हात जोडले! कोणाच्यातरी किंचाळन्यानं सर्वांचे डोळे खाडकन उघडले तर.. पाटील, पूजेच्या अग्नीकुंडावर उलटा लटकत होता, आणि जीवाच्या आकांतानं ओरडत होता “सोडा मला, सोडा मला, मी चुकलो..” धर्माबाबा कडाडला “पाटला, आता तरी काय ते खरं बोल, नाही तर ही पोरं सोडतील तुला आगीत. ती सुटतील, पण तू मुंजा होऊन कायमचा त्या चिंचेच्या झाडाला लटकशील..” पाटील जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करत होता पण, आता ते त्याला शक्य नव्हते. शेवटी रडत रडत पाटील म्हणाला “धर्माबाबा वाचवा मला, मी सांगतो सगळं खरं. गावात चोऱ्या आणि बिरोबाचं मंदिर आम्हीच लुटलं होतं, मी रम्या आणि हणम्याची मदत घेऊन. सगळं सोनं माझ्या शेतातील विहिरीत दडवून ठेवलं आहे.” सगळं गाव आधी हवेत उलटा लटकलेला पाटील बघून दंग होते, पण त्याचा कबुलीजबाब आला तसा, गावाचा राग उफाळून आला व एक सुरात अनेक आवाज आले “पाटलानं बिरोबाला लुटला??? मारा त्याला.. जाळा त्याला!!!!” आणि जमाव पाटलाकडे धावून येऊ लागला तोच... धर्माबाबाने आवाज दिला “थांबा, त्यांचा सूड त्यांना घेऊ द्या. मी त्यांना तसे वचन दिले हाय, आणि त्या बदलात मी गावासाठी अभयदान घेतलं हाय.” धर्माबाबानं लटकलेल्या पाटलाकडे पाहिले व म्हणाला “पाटील, आता जाब बिरोबाला द्या.” लटकलेला पाटील धाडकन अग्नीकुंडात पडला..

धुरकटलेल्या खोलीत

धुरकटलेल्या खोलीत,
तो टकटकतोय केव्हापासून
काळवेळ त्याने मागे सोडला आहे
तुटलेली नाळ सावरत तो
अभासी विश्वात स्वत:ला शोधतो आहे
अफाट कचरा स्वत:च्या खोलीत आणि
तो अभासी स्वच्छता करतो आहे केव्हापासून
चार मित्र जोडू म्हणत म्हणत चार हजार झाले
गल्लीतला बालमित्र पक्या,
रोज नाक्यावर याची वाट पाहतो आहे
संवादाने प्रश्न सुटतात
असे तो नेहमी टंकतो केव्हापासून
बोलायला केव्हा विसरला तेव्हापासून
तिचे मिसकॉलवर मिसकॉल इग्नोर करत
भावनेचा अर्थ शोधतो अनेकांच्या लेखातून
त्याच्या धुरकटलेल्या खोलीला,
एकच खिडकी आहे,
पण सदा बंद उगाचच
पण त्याच्या पीसीवर १० खिडक्या उघड्या कायम
त्यापण उगाचच.. पण तो म्हणतो
मी सत्य शोधतो आहे,
'येथे' समजाला माझी गरज आहे
ढीगभर रोज ऑनलाईन पिटीशन साईन करतो आहे
अगदी पहिली त्याने हजारभर
कोस दूर असलेल्या
गावात रस्ते नाही म्हणून असलेली
तेव्हापासून तेच करतो आहे,
स्वत:च्या गावात रस्तेच काय,
पाणी, शाळा, व्यवस्था नसलेले विसरून
धुरकटलेल्या खोलीला पहात
कधी कधी म्हणतो तो..
खूपच धूर झाला नाही..
मी उघडू खिडकी म्हणालो की
घाबरायचा, राहू दे म्हणायचा..
मला असचं बरं वाटतं...
तो सूर्य परका वाटतो...
इकडचा अंधार देखील मला ओळखतो,
पण या खिडकीच्या बाहेर...
अनोळखी लोकांचे गाव आहे...
उगाच हसतील मला पाहून
मी येथेच बरा आहे...
धुरकटलेल्या खोलीत..
टकटक करत बसलेला...
अरे, उडतो खिडकी...
कोण हसतं ते आपण पाहू....
तो नको नको.. म्हणत होता
मी खाडकन खिडकी उघडली....
समोरच्या बाल्कनीतून मंजुळसा
आवाज आला..
"कधीतरी ही खिडकी उघडेल ही आशा होती..
छान लिहितोस... पण ते त्या खिडकीत..
कधीतरी असा समोर बसून पण बोलना"
तोच पक्या खालून ओरडला,
चाललो आहे रे नाक्यावर..
ये.. कटिंग घेऊ..
तो हसला, माझ्याकडे पहात म्हणाला..
हसत नाही रे लोक!
भरपूर धुरकटलेल्या
खोलीत आता मंद सुगंध होता..
बसं तो पीसीमात्र आता धुळीत होता...

Friday, November 7, 2014

महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने

टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली
रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली
जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली
मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली
होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली
एखादी कविता, एखादं काव्य किंवा एखादं कडवं आपल्याला एवढं आवडून जातं की आपल्या मनात, विचारात कित्येक दिवस ते थैमान घालत असतं. टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली हे जेव्हा वाचले होते तेव्हा अशीच काहीशी अवस्था माझ्या मनाची देखील होती. आपण जे जगतो जे जीवन आपल्याला मिळालेले आहे, नशीबाने, दैवयोगाने आपली परिस्थिती अशी कधी कधी होते की जे मिळालेले आहे ते अपुर्ण आहेच पण जे मिळालेले आहे कोणीतरी दान दिले आहे अशी भावना जेव्हा मनात उत्त्पन्न होते तेव्हा जी बिकट अवस्था होते त्यांचे शब्दात वर्णन करणे अवघड आहे. अनेकदा जे घडले ते वाईट, जे घडत आहे ते वाईट की जे घडणार आहे ते वाईट या संभ्रमात एखादा/एखादी असते तेव्हा वरील ओळी सहजच मनातून उभारत.. निस्तेज कागदावर आकार घेऊ लागतात....
टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली
सगळेच अस्ताव्यस्त आहे, काय चालू आहे काय बिघडलं आहे याचा काहीच कुठे अर्थ लागत नाही आहे. दिवस दिवस निघून जात आहेत, जगणं चालू आहे पण तुकड्या तुकड्यात. एखादा तुकडा दिवसाचा असा की वेळ करायला देखील फुरसत नाही व एखादा तुकडा असा की 'तो' विचार करायला वेळच का मिळाला असा.. दिवसाचं ठीक आहे, कोणी येतं कोणी जातं.. विचारांची शृखला तुटत राहते.. थोडा उसंत मिळते, वेळ कामात निघून जातो पण रात्रीचे काय? जेवढं नशीबात दान आहे तेवढं मिळणारचं पण हे जे घडते आहे, दिवस व रात्र क्षण क्षण जळणे हा भोग कसा सुटणार?
धज्जी धज्जी रात मिली... सरळ साधा अर्थ घेतला तर ती रात्रभर तळमळते आहे, घडलेल्या घटनेमुळे अस्वस्थ आहे ती. पण मला लागलेला अर्थ असा आहे की, ती थोडीफार झोपु शकत आहे, पण त्याच्या आठवणीमुळे तो स्वप्नात येण्यामुळे ती चलबिचल आहे, जे घडायचे ते घडून गेलं आहे पण तीला तो निसटता धागा सोडायचा नाही आहे, त्यासाठी तीची आंतरिक तळमळ चालू आहे. निसटत्या धाग्याला एक वेळ प्रयत्नपुर्वक एका जागी बांधता येईल, पण तो धागा हातचाच सुटला तर सगळचं रंगहीन होऊन जाईल.. त्यामुळे तीची धडपड ही तो धागा सूटू नये म्हणून आहे.
रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली
सगळे ठीक आहे, पण दु:ख देणाराच समोर हसत हसत उभा राहीला तर काय? निलकंठेश्वर व्हावे लागते हो अश्या अवस्थेत. तो भेटला याचा आनंद असतो, पण यांनेच आपली प्रताडना केली, याच्यामुळेच आपल्याला त्रास झाला हे विसरून तो हसला म्हणून हसावे देखील लागते.. वर वर.. पण आत ह्दय? त्याचे काय? तो घाय मोकळून रडू पण शकत नाही मग दोन्ही अवस्था सुखाची व दु:खाची देखील प्यावी लागते, जसे विष!
कवयत्रीने यह अच्छी बरसात मिली या ओळी अत्यंत कल्पकतेने वापरला आहेत व ती रिमझिम शब्दाला जोडून येते म्हणून छान वाटते असे नाही.. हिंदी मध्ये एक शब्द आहे "सौगात" हा लक्षात घेतला तर बरसातचा पंच आपल्याला लगेच समजेल.
जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली
जेव्हा नाती तुटतात, एखादा जवळचा दुर जातो. सुरवातीला आपल्याला वाटत असतं की हट्ट मला काही फरक पडत नाही. त्याला माझी नाही तर मला त्याची का कदर असावी, पण तसं नसतं आपल्या आतून एवढं दु:ख, वेदना झालेल्या असतात की जसे आपल्या ह्दयाचा एक तुकडा कोणीतरी कापून आपल्या सोबत घेऊन गेला आहे व त्या तुकड्याची त्याला कदर नाही. पण आपण आपल्याला आपल्या मनाला समजावत असतो की ठीक आहे गेला ना / गेली ना काही फरक पडत नाही. मी खुष तर जग खुष! आपण वर वर खूप खुष असतो स्वतःवर व जगावर देखील पण जेव्हा आर्ततेने आपण जेव्हा आपल्याकडेच पाहतो (येथे कवयत्रीने हँसने की आवाज सुनी हे कडवं वापरलं आहे) तेव्हा कळतं की हे सगळं खोटं आहे, आपल्याला माहीती आहे आपल्या काय त्रास व दु:ख आहे ते.... ले फिर तुझको मात मिली या ओळी हेच सांगतात की तुला असे वाटत असेल की तुझी अवस्था कोणाला माहीती नाही आहे पण.. तुझ्या अंतरमनाला नक्कीच माहीती आहे साहेबा.. काय घडलं व का असे खोटं खोटं जगतो आहेस.
मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली
कशी बिकट अवस्था होते पहा, आपण थांबलो म्हणून जग थांबत नाही, ते चालतच राहते, जसे ते चालणार आहे. आपण पण आपल्याला हवे तसे थोडेफार जागायचा प्रयत्न करतो पण जेव्हा जिवनसाथी, आपला सदासर्वकाळ सोबत राहणारा आपला हमसफर.. आपला मित्र जेव्हा आपल्या जगण्यावागण्यात विसंगती शोधण्याचा किंवा दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न करतो तेव्हा आपण बेचैन होतो.. आपली आत्मा आत गुदमरु लागते. कसे आहे कसे जगावे हा प्रत्येकाचा व्यक्तीगत मामला आहे पण एखादा जेव्हा नवरा होतो किंवा एखादी जेव्हा बायको होते त्यांना वाटतं की अरे समोरचा बिघडलेला आहे त्या सुधरवायलाच हवा... मी प्रयत्न करते.. मी प्रयत्न करतो.. पण या प्रयत्नाचीच कधी कधी बंधने होतात अभिजात कलावंताची कलाकृती त्या बंधनामुळे मरणासन्न अवस्थेत जाते. हे समजून उमजून एखाद्याला तथाकथित सुधारण्याचा प्रयत्न करावा.. बघा ना कवयत्री म्हणते आहे की मला हवा तसा साथी मिळाला नाही असे नाही पण त्याच्यासाठी व त्याच्या नुसार आठ पहर चालावे देखील लागत आहे व शेवटी हाती काय तर बेचैनपणा! अशांती!
होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली
मनात असलेलं, खरं खुरं अगदी बाहेर येण्याच्या बेतात असतं कधी कधी, पण आपणच स्वतःवर बंधने घालतो व वेळ मारून नेतो, का? तर आपल्याला माहीती असते समोरचा एवढा देखील वाईट नाही आहे, तो आपली काळजी करतो किंवा किमान तेवढं भासवतो तरी आहे.. मग आपण तोंडात आलेले वाक्य बदलतो व त्या आवेगाने बाहेर पडलेल्या शब्दाला एक वेगळाच आयाम देतो व आपली सुटका करून घेतो.. समोरचा कसा आहे हे व्यक्त करण्यासाठी कवयत्रीने जलती-बुझती आँखों में हे कडवं वापरलं आहे.
कसं आहे, प्रेम व त्याची अभिव्यक्तीची रुप अनंत आहेत.. फक्त ते व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा नजरीयां अलग!
आणि हो, सांगायचेच राहीले या महज़बीन बानो म्हणजे कवयत्री नाज़
नाज़ म्हणजे तुम्हाला अर्थ बोध होणार किंवा नाही माहीती नाही, जाता जाता सांगायचे म्हणून सांगून जातो.. नाज़ म्हणजे अभिनेत्री, ट्र्जेडी क्वीन मीना कुमारी!

Tuesday, November 4, 2014

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने

प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी
जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी
जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी
मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं
पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी
(पंजाबी)
(हिंदी)
मैं तुझे फ़िर मिलूंगी
कहाँ किस तरह पता नही
शायद तेरी तख्यिल की चिंगारी बन
तेरे केनवास पर उतरुंगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
खामोश तुझे देखती रहूंगी
या फ़िर सूरज कि लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूंगी
या रंगो कि बाहों में बैठ कर
तेरे केनवास से लिपट जाउंगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे जरुर मिलूंगी
या फ़िर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूंगी
और एक ठंडक सी बन कर
तेरे सीने से लगूंगी
मैं और कुछ नही जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म खतम होता है
तो सब कुछ खत्म हो जाता है
पर चेतना के धागे
कायनात के कण होते हैं
मैं उन कणों को चुनुंगी
मैं तुझे फ़िर मिलूंगी !!
कविता वाचली, जिवनात पहिल्यांदा अमृता प्रीतमच्या लेखनीची ओळखत त्या वेळी झाली. अद्भुत! मागे मी लिहले होते, प्रत्येक गोष्ट शब्दात व्यक्त करणे जवळ जवळ अशक्य असते, तसे काहीसे घडलं होते जेव्हा ही कविता सर्वात प्रथम वाचली होती तेव्हा. त्यानंतर अनेक पारायणे झाली या कवितेची, प्रत्येक वाचनानंतर खूप काही नवीन सापडतं जातं या कवितेत. व ज्यांना अमृता प्रीतम व त्यांचे जीवन या बद्दल थोडेफार जरी माहिती असेल तर या कवितेचे मर्म समजेल.
काही व्यक्ती जिवन स्वप्नवत जगतात, त्यातील एक म्हणजे अमृता प्रीतम. स्त्रीची व्यथा, दुखः त्यांनी सशक्तपणे आपल्या लेखनीद्वारे व्यक्त केल्या. "मैं तैनू फ़िर मिलांगी" ही फक्त कविता नाही आहे. आपल्या प्रेमीची वाट पाहत असलेल्या प्रियसीच्या अतंरगातील अवस्था आहे , अमृता जेव्हा खूप आजारी होत्या व त्यांना आपल्या अंताची कल्पना आली होती तेव्हा ही कविता त्यांनी इमरोज साठी लिहली होती. अमृतासाठी इमरोज काय होते हे त्यांच्या लेखनीतून वारंवार येत असे, पण ही कविता म्हणजे इमरोज वर त्यांच्या असलेल्या उत्कट प्रेमाची साक्ष आहे.
प्रेम, विरह, मिलन या तीन गोष्टीवर उभी असलेली ही कविता, पाहताना साधी वाटते एकदम सोपी शब्द रचना पण जेव्हा त्यातून अर्थ ध्वनीत होतो, जेव्हा त्या कवितेचा भावार्थ आपल्याला समजतो तेव्हा ही कविता आपल्या मनाच्या कुठल्यातरी नाजुक कोपर्‍याला हलकसे स्पर्श करुन जाते. प्रत्येक ओळ आणि ओळ आपल्या समोर कवियत्रीच्या मनातील भावना चित्रवत उभ्या करतात.
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी
मी तुला कशी, कुठे भेटेन माहिती नाही, शक्यतो तुझ्या कुठल्यातरी कलाकृतीतील अनुभुती म्हणून, एखादी मनातील तेजस्वी कल्पना म्हणून, एक कलाकृती म्हणून येईन व तुझ्या केनवास वर अवतरीत होईन. नाहीतर त्याच केनवासवर एक रेघ म्हणून असेल, तुला नकळत तुला पाहत राहीन. काय सहज सुंदर कल्पना आहे, आपल्याच प्रेमीच्या कलाकृतीमध्ये येण्याची आस, ती रचना. वाचताना आता सोपं वाटतं, पण थोडं विचार करून पाहिले की लक्ष्यात येईल ही विरह नक्की आहे, कवयत्रीला तो मान्य देखील आहे पण तीची इच्छा आहे परत येण्याची आपल्या आवडत्या व्यक्तीकडे. शक्य नसेल तर इतर माध्यमातून पण यायचे आहे, त्याच्यात हरवून जायचे आहे.
जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी
उच्च! वरील ओळी शब्दात कश्या व्यक्त कराव्यात, शब्द अपुरे पडत आहेत. कसं ही करून मला तुझ्या सोबतच रहायचे आहे, तुझ्यापासून मी दुर राहू शकत नाही ही भावना व अतुट प्रेमाची उच्चतम अवस्था अश्या प्रकारे सहज भाषेत व्यक्त करणे अमृताच जाने. तिला विश्वास आहे, ती नसली तरी प्रेमीच्या मनातून, त्याच्या अंतरंगातून ती कधीच जाणार नाही म्हणून तीला खात्री आहे, त्याच्या कलाकृती मधून, रंगाच्या छटामधून ती डोकावत राहिल, अनेक वेळा.
जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी
वाह क्या बात है, वेगाने उसळणार्‍या, मुक्त होऊ पाहत असलेल्या एका पाण्याचा झरा व्हावे, नाही तर एक थेंब होऊन तुझ्यात विरून जावे. मिलन! या पेक्षा उत्कृष्ट मिलन दुसरे कुठले असू शकते ? रचनेचा भावार्थ जर पाहिला तर तुझी माझी भेट कशी व्हावी, तर ती अशी असावी की मी तुझ्यात व तु माझ्यात विरून जावे. जी व्यक्ती खरचं वाहत्या पाण्यासारखं जगली असेल, मनसोक्त, आपल्याला हवे तसे तीच एवढी सुंदर रचना उभी करू शकते, ज्यांनी त्यांचे आत्मचरित्र वाचले असेल त्यांना ते लगेच समजेल, आजच्या काळात लिव्ह-ईन-रिलेशन लोकांना पचनी पडत नाही तेथे अमृता प्रितम १९४०-४५ च्या आसपास लिव्ह-ईन-रिलेशन मध्ये राहत होत्या, इमरोज त्यांच्यापेक्षा वयांनी लहान होते. या वरून कल्पना येईल.
मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं
पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी
जीवन-मरण, शरीर-आत्मा काहीच नाही, काळाच्या ओघात सगळे नष्ट होईल, मला माहिती आहे. मला तुझ्या सोबत रहायचे आहे पण हळूहळू सगळे नश्वर होत चालले आहे, मी ही जाईन, अशी वेळी येईल की सर्व संपलेले असेल. अमृता प्रीतम नी ही कविता फक्त लिहलेली नाही आहे तर जगल्या आहेत. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ त्यांच्या अंतर्मनातून उमटत जात आहे हे वाचणार्‍याला समजतं, म्हणून म्हणालो त्या कविता जगल्या आहेत. अनेकवेळा छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरत असतो, अचानक नाती तोडतो, एखाद्याचे भावविश्व आपण उद्घवस्त करतो नकळत त्यावेळी आपण जीवनाचे सत्य कुठेतरी विसरतो. त्या म्हणतात "कि वक्त जो भी करेगा" काळाला काय करायचे आहे ते करू दे, हा वेळ तर तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. शरीर जाणार आहे, मी जाणार आहे पण कुठे ना कुठेतरी मी तुझ्या सोबत असेन, तुझ्या मनात, तुझ्या हदयात. एक एक अणू-रेणू गोळा करेन, स्वतःला पुन्हा तुझ्या समोर घेऊन येईन, काही होवो तु व मी कधी ना कधी तरी एक नक्कीच होऊ, तेथे बंधन नसेल, तेथे नश्वर वस्तुची गरज नसेल फक्त तु व मी असू आपली भावना, प्रेम असेल. काही हो आपण पुन्हा एकत्र येऊ. प्रबभ इच्छा व उत्कठ प्रेम यांचा संगम म्हणजे ही कविता. आपल्या एक एक अक्षरातून आपल्या समोर उभी राहत जाणारी एक प्रेम कविता.
तुम्हारे इकरार को फूल की तरह नहीं पकड़ा था, अपनी मुट्ठी में भींच लिया था. वह कई बरस मेरी मुट्ठी में खिला रहा. पर मांस की हथेली मांस की होती है, यह मिटटी की तरह हमेशा जवान नहीं रहती. इस पर समय की सलवटें पड़ती हैं और जब यह बंजर होने लगती है तो इसमें उगा हर पत्ता मुरझा जाता है. तुम्हारे इकरार का फूल भी मुरझा गया............अमृता प्रीतम
अमृताप्रीतम एक लेखिका, कवयत्री म्हणून जेवढ्या भावतात त्यापेक्षा ही जास्त त्यांच्यात असलेली प्रेमिका मला भावते, वादळी व्यक्तीमहत्त्व होते यात शंका नाही, त्यांच्या चांगल्या गोष्टीपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या साहिर लुधयानवी सोबत असलेल्या संबधाच्या, इमरोज वर करत असलेल्या जिवापाड प्रेमाच्या व त्यांच्या सिगरेट पिण्यापासून त्यांच्या व्यक्तीगत सवयींच्याच झाल्या. पण ज्यांना त्यांची लेखनी भावली ते अमृता प्रितमला कधीच विसरू शकणार नाहीत, अशी एखादीच अमृता प्रीतम शतकामध्ये जन्मते, तिच्या लेखणी ला, तीच्या भावविश्व जपण्याच्या प्रवृत्तीला, स्वप्न पाहण्याची व ती खरी करण्याची जिद्दीला माझा मनापासून सलाम! ज्यांना भेटतं जेव्हा शक्य होतं तेव्हा भेटू शकलो नाही अश्या मोजक्याच व्यक्तीमध्ये अमृता प्रितम येतात याची हुरहुर मनाला कायम लागून राहील.